नगर परिषद व नगर पंचायतीच्या रणधुमाळीला सुरुवात, निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 664 उमेदवारी अर्ज

राज्यातल्या 246 नगर परिषदा व 42 नगरपंचायतींच्या रणधुमाळीला आजपासून सुरुवात झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पहिल्याच दिवशी 664 उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील उमेदवारांना उमेदवारी अर्ज व शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. एका नोंदणीद्वारे संबंधित प्रभागात एका उमेदवारास चार उमेदवारी अर्ज दाखल करता येऊ शकतील. संकेतस्थळावर संपूर्ण उमेदवारी अर्ज व शपथपत्र भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढून त्यावर स्वाक्षरी करावी लागेल. त्यानंतर ती प्रत विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे आवश्यक राहील.

उमेदवारांना ऑनलाईन माहिती 17 नोव्हेंबर दुपारी 3 पर्यंत सादर करता येणार

इच्छुक उमेदवारांनी आताच ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून घ्यावी व आपला लॉगीन आयडी व पासवर्ड आपल्याकडे जपून ठेवावा. कारण संपूर्ण उमेदवारी अर्ज आणि शपथपत्र भरण्यासाठी ते आवश्यक आहेत. आताच ऑनलाईन नोंदणी करून ठेवल्यास ऐन वेळी होणारी धावपळ टळू शकेल. उमेदवारी अर्जातील आणि शपथपत्रांतील संपूर्ण माहिती भरल्यानंतर प्रिंटआऊटवर सही करून ती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विहित मुदतीत म्हणजे 17 नोव्हेंबरपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करणे सुलभ होईल. संकेतस्थळावरील ऑनलाईन माहिती मात्र 17 नोव्हेंबर दुपारी 2 वाजेपर्यंतच भरता येईल.

10 नव्या नगर परिषदा

राज्यात 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यातून 6 हजार 859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे. 10 नवीन नगर परिषदा आहेत, तर 15 नवीन नगरपंचायती आहेत.