
>> हर्षवर्धन दातार
हिंदी चित्रपट संगीताच्या सोनेरी युगातील 50 आणि 60 च्या दशकातील काही अभिजात संगीतकारांची स्वतची अशी एक ‘असली’ शैली होती आणि त्यांनी प्रसंगानुरूप आपल्या शैलीच्या विरुद्ध काही ‘नकली’ चाली बांधल्या होत्या. आज त्याच प्रवाहाला पुढे नेत अजून काही संगीतकारांबद्दल चर्चा करत आहे… त्यांच्या ‘मूळ’ शैलीतली आणि काही ‘हटके’ गाण्यांविषयी सांगणारी ही मम सुखाची ठेव…
राय बहादर चुनीलाल कोहली यांचा मुलगा मदन आपली सैन्यातली नोकरी सोडून चित्रपट संगीतात आपलं नशीब काढायला आला. 1946 मध्ये त्याने आकाशवाणीमध्ये काम सुरू केलं जिथे मदन उस्ताद अली अकबर खान, तलत मेहमूद बेगम अख्तर यांच्या संपर्कात आला. हाच तो संगीत निर्देशक मदन मोहन (1924-1975) ज्याने चित्रपट संगीत विश्वात राज्य केलं, मंत्रमुग्ध करणारी गाणी दिली आणि लताजींच्या कारकीर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली.
गजलसम्राट म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे मदन मोहन त्यांच्या संगीतातून दुःख आणि कारुण्य या संवेदनांची एक निराळीच ओळख करून देतात. तरीसुद्धा त्यांची अनेक गाणी ही गजल प्रारूपात नसूनही अत्त्युच्च दर्जाची आहेत. नैना बरसे- आणि शोख नजर की बिजलिया – वो कौन थी (1964), दिल ढुंढता- मौसम-1975, ए दिल मुझे बता दे -भाई-भाई (1956) ही सर्व गाणी गजल नसूनही चित्रपट-गीत या धाटणीची आहेत. मदन मोहन यांची अनेक गाणी शास्त्राrय बाजाची असली तरी त्याला एक वेगळा नाद आहे. राजेंद्र कृष्ण, राजा मेहंदी अली खां, मजरूह सुल्तानपुरी नक्श लायलपुरी अणि क़ैफी आजमी यांच्यासोबत त्यांनी काही अविस्मरणीय गजल रचल्या. जहाँआरा (1964)- वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जलते हैं, अदालत (1958)- ‘यूँ हसरतो के दाग’, ‘दिल की राहें’ (1973)- ‘रस्मे उल्फत को निभाए’ या त्यांच्या काही उत्कृष्ट गझला. प्रख्यात सितारवादक उस्ताद रईस खान अणि मदनमोहन यांचे सितारच्या माध्यमातून एक अतूट नाते होते. हँसते जख्म (1973)- ‘आज सोचा तो आँसू भर आये’ अणि दस्तक (1970)- ‘बैयां ना धरो’ या गाण्यात चाली व लताजींच्या स्वर्गीय गायकीबरोबर सतारही ऐकत राहावी अशी अप्रतिम साथ देते. अनेक गाण्यांत त्यांनी पाश्चात्य हार्मनी अभिनव पद्धतीने जोडली. सत्तरच्या दशकातील संगीतावर वाद्यवृंदाचा प्रभाव, ताज्या दमाचे राहुल देव बर्मन व लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत लोकप्रिय होत असताना मदन मोहन यांनी पाश्चात्य संगीत आणि भव्य वाद्यमेळ असलेली गाणी दिली. ‘हस्ते जख्म’ (1973)-तुम जो मिल गये हो आणि आर.डी बर्मन (पंचम) च्या शैलीशी साम्य असणारं साहेब बहादूर (1977)- राही था मैं आवारा, ही काही ठळक उदाहरणे.
पाश्चिमात्य सिम्फनीचे गाढे अभ्यासक, एखाद्या संगीतरचनेची संकेतलिपी (notation) लिहिण्याचा हाथखंडा असलेले व संगीत समीक्षकांनी ‘सृजनशील बंडखोर’ अशा उपाध्या दिलेले संगीतकार सलील चौधरी (1925-1995). लोकसंगीत, पाश्चात्य, सिम्फनीवर आधारित कॉर्डस् असे भिन्न प्रवाह बरोबर घेऊन अभिजात भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा मेळ सलिलदांनी बसविला. कॉयर, ऑर्गन आणि इंग्लिश फ्लूट असा कमीत कमी वाद्यमेळच्या साथीने आणि कुठल्याही तालवाद्याशिवाय चर्च कॉयरचा इतका सुंदर उपयोग परख (1960) मधील ‘मेरे मन के दिये’ या गाण्यात दिसतो. पिकालो म्हणजेच (English flute), चेल्लो (cello) ऑर्गन ही वाद्ये सलिलदांच्या अनेक संगीत रचनांतून आपल्याला ठळकपणे ऐकायला मिळतात. या विलक्षण हार्मोनीमध्ये अक्षरश देवत्वाची प्रचीती येते. दो बीघा ज़मीन (1953) मधील ‘धरती कहे पुकार के’ आणि ‘हरियाला सावन ढोल बजाता आया’ गाण्यातून इथल्या मातीचा सुगंध दरवळतो. परिवार (1967) यातील ‘झिर झिर बदरवा बरसे’च्या सुरावटीतून आपण जणू काही चिंब भिजून निघतो तर मोझार्तच्या सिम्फनीवर आधारित छाया (1961) – ‘इतना ना मुझसे तू प्यार जता’, उसने कहा था (1960) – ‘आहा रिमझिम के प्यारे प्यारे गीत लिये’ ही नितांत सुंदर गाणी. सत्तरच्या दशकात कथेला तसेच त्यावेळच्या सामाजिक स्थितीला अनुसरून सलिलदांनी आपल्या संगीतातील वाद्यमेळात आधुनिकता आणली. रजनीगंधा (1974) यातील ‘कई बार युंही देखा है’मध्ये ट्रम्पेट आणि सॅक्सोफोनचा उपयोग तर अन्नदाता (1972) यातील ‘गुजर जाये दिन’ हे अतिशय अवघड नागमोडी चालीचे गाणे, अग्निपरीक्षा (1981)- ‘मिल गयी अचानक मुझे’ ही गाणी सलिलदांच्या संगीतामधील बदलाचं द्योतक.
काहीशा अवघड आणि विचार करायला लावणाऱया चाली, शास्त्राrय संगीतावर आधारित चाली, कधी काळाबरोबरच तर कधी पुढच्या काळातील संगीत. ही विशेषणं लागू पडतात विलक्षण प्रतिभावंत संगीतकार जयदेवजींना (1918-1987). सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत संगीतात तोच प्रभाव त्यांनी कायम टिकवला. मोजके चित्रपट आणि गाजलेली गाणी ही जयदेवजींची खास ओळख. नैरोबीत जन्म, नंतर काही वर्षे लुधियाना येथे आणि मग मुंबई असा प्रवास करताना सुरुवातीला सरोद वादक अली अकबर खां साहेब आणि सचिन देव बर्मन यांचे सहाय्यक संगीतकार म्हणून काम पाहिलं. चेतन आनंदचा ‘जोरू का भाई’ (1955) त्यांचा पहिला स्वतंत्र चित्रपट. पुढे नवकेतनच्या हम दोनो (1961) मधील जीवन तत्त्व सांगणारं ‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया’ आणि कालातीत प्रेमगीत ‘अभी न जाओ छोडकर’ यातून जयदेव प्रकाशझोतात आले. आलाप (1977)-‘कोई गाता मैं सो जाता’, किनारे किनारे (1963)- ‘हर आस अष्कबार है’ आणि भीमसेन जोशींनी गायलेले ‘रघुवर तुमको मेरी’ – अनकही (1985) हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जरी चाललं नसलं तरी त्यातलं संगीत मात्र अजूनही ऐकलं जातं.
नंतर संगीत आणि वाद्य संगीत तंत्रात, ध्वनिमुद्रणात प्रगती होत गेली तसे त्या काळातील संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, सचिन व राहुल देव बर्मन, कल्याणजी आनंदजी, बप्पी लाहिरी, राजेश रोशन यांचा आवाका प्रशस्त आणि विस्तारलेला होता. त्यांच्यावर मात्र एका विशिष्ट स्टाईलचा शिक्का मारणं कठीण होतं.
[email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)