पहलगाम पुन्हा एकदा पर्यटकांनी फुलले, कश्मिरच्या खोऱ्यात पर्यटकांची भटकंती वाढली! ओमर अब्दुल्ला

पहलगाम हल्ल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी कश्मिरमधील नागरिकांवर झालेल्या दुर्लक्षाबद्दल वारंवार माध्यमांशी बोलताना निराशा व्यक्त केली होती. परंतु आता नुकतेच कश्मिर खोरे पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजले आहे. त्यामुळे ओमर अब्दुल्ला यांनी कश्मिरचे पर्यटन जोर धरु लागल्याबद्दल, समाधान व्यक्त केले आहे.

“देशाच्या विविध भागातील पर्यटकांनी थंड हवामान आणि पावसाळी हवामानाचा आनंद घेण्यासाठी, पुन्हा एकदा कश्मिरच्या खोऱ्यात परतले आहेत असे अब्दुल्ला यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. पहलगाममधील पर्यटन आता पुन्हा एकदा जोर धरु लागले आहे. याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पहलगामवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आॅपरेशन सिंदुर अंतर्गत हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या. परंतु याच घडामोडीत पाकिस्तानच्या सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात अनेक कश्मिरी नागरीक मरण पावले. या नागरिकांकडे सरकार लक्ष देत नसल्याचं ओमर अब्दुल्ला यांनी माध्यमांशी बोलताना मागील काही दिवसात म्हटले होते. याचबरोबरीने कश्मिर सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे कश्मिर खोऱ्यात पुन्हा एकदा पर्यटक येऊ लागले आहेत ही बाब आम्हा सर्वांसाठी खूप आशावादी आहे असेही म्हटले आहे.

22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कश्मिर अक्षरशः कोलमडले. पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे, बहुतांशी पर्यटकांनी कश्मिरकडे पाठ वळवली. त्यामुळे कश्मिरच्या अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली होती. परंतु आता तब्बल दीड ते दोन महिन्यांनंतर कश्मिर खोऱ्यात पर्यटकांची रेलचेल आता वाढताना दिसत आहे.

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी रविवारी सांगितले की, काश्मीरमधील पर्यटन पुनरुज्जीवनासाठी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना फळ मिळत आहे, कारण पर्यटक खोऱ्यात परत येत आहेत. अधिक बोलताना ते म्हणाले, मी गेल्या वेळी पहलगामला गेलो होतो तेव्हा मी सायकलने एका अशा बाजारपेठेतून गेलो होतो. ती बाजारपेठ अक्षरशः सुनसान होती. आज मी पुन्हा पहलगामला आलोय आता मात्र याठिकाणी पर्यटकांची गर्दी दिसू लागली आहे. हे चित्र आमच्यासाठी खरोखर खूप आशावादी आहे.

22 एप्रिलला बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाममधील पर्यटनाला मोठा फटका बसला होता. यात 25 पर्यटक आणि एका स्थानिक पोनी चालवणाऱ्याचा मृत्यू झाला होता.