
पाकिस्तान सध्या पुराच्या पाण्याने बेजार आहे. हिंदुस्थानातील विविध नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून या नद्यांतील पाण्याच्या विसर्गामुळे पाकिस्तानात हजारो लोकांना याचा फटका बसला आहे. पाकिस्तानातील संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुराच्या पाण्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. ‘पाकिस्तानात आलेला पूर म्हणजे अल्लाहचा आशीर्वाद आहे, घरापर्यंत पाणी आले असेल तर पाण्याने बादल्या भरून ठेवा,’ असे विधान ख्वाजा आसिफ यांनी केले आहे. त्यांच्या या विधानांची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू झाली आहे.
ख्वाजा आसिफ यांना पत्रकाराने पाकिस्तानातील पुराबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना ख्वाजा आसिफ म्हणाले की, पाकिस्तानी लोकांनी या पुराच्या पाण्याला अल्लाहचा आशीर्वाद मानावा. पुराच्या पाण्याला बादल्यामध्ये भरून ठेवावे. ते म्हणाले की, संपूर्ण जगात पाण्याच्या अडचणीमुळे हाहाकार उडाला आहे. त्यामुळे पाकिस्तानात जर पुराचे पाणी आले असेल तर ते अल्लाहचा आशीर्वाद आहे. पुराचे पाणी हे संकट नाही तर अल्लाहचा आशीर्वाद आहे, असे ते म्हणाले.
पाणी जमा करा!
पुराचे पाणी आणि मुसळधार पावसामुळे लोक उतरून सरकार प्रशासनाविरोधात आंदोलन करत आहेत. रस्ते जाम करून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. यावर ख्वाजा म्हणाले की, लोकांनी आधी पाणी जमा करण्यावर लक्ष द्यायला हवे. पाणी घरी भरून ठेवायला हवे. यामुळे सर्व समस्या कमी होतील. पाणी जमा करण्यासाठी मोठ्या बंधाऱ्यांची गरज आहे. परंतु, सध्या ते शक्य नाही. त्यामुळे लोकांनी घरातच पाणी साचून ठेवावे. पुराला रोखण्यासाठी सरकारकडे सध्या कोणतीही सिस्टम नाही. लोक विनाकारण सरकारला दोष देत आहेत, असेही ते म्हणाले.
पुरामुळे ८५४ लोकांचा मृत्यू
२६ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत पाकिस्तानात पुरामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ८५४ झाली आहे. ११०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पुरामुळे पंजाब प्रांतात जवळपास २० लाख लोकांना याचा फटका बसला आहे. झेलम, चिनाब आणि रावी नद्यांनी पाण्याची धोक्याची पातळी ओलांडली आहे. पंजाब प्रांतात १० लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.