
आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी साधारणपणे 20 लाख वारकरी, भाविक येतात. यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व गुन्हेगारावर करडी नजर ठेवण्यासाठी पोलीस विभागाकडून एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. याकरीता ड्रोनचा वापर, गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि भाविकांची संख्या मोजणे शक्य होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी दिली.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुर येथे जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंगळवार दि. 10 जून रोजी बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी म्हणाले की, आषाढी यात्रेत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला 20 लाखाहून अधिक भाविक दाखल होतात. यामुळे चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन मंडप, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, स्टेशन रोड या ठिकाणी भाविकांची गर्दी होणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व यात्रा कालावधीत गुन्हेगारी लोकांचा भाविकांना त्रास होऊ नये. यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यात्रेवर दहा ड्रोन कॅमेर्यांद्वारे करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
यंदा यात्रेत प्रथमच भाविकांची संख्या एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोजली जाणार आहे. तसेच जेथे भाविकांची गर्दी होईल, त्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. खिसे कापू, महिलांची पर्स, सोने चोरी रोखण्यास देखील एआय तंत्रज्ञानाव्दारे शक्य होणार आहे. आषाढी यात्रा कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.