
‘हंड्रेड डेज’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’ यासह अनेक गाजलेल्या हिंदी आणि बंगाली चित्रपटांचे दिग्दर्शक पार्थो घोष यांचे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते हृदयविकाराने त्रस्त होते. अखेर सोमवारी सकाळी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी गौरी घोष आहे.
पार्थो घोष यांचे चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले नाहीत तर त्यांनी सामाजिक मुद्द्यांवर जागरूकता पसरवण्याचे कामदेखील केले. सामाजिक आणि संवेदनशील चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यात त्यांचा हातखंडा होता. 1985मध्ये त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या प्रवासाला सुरुवात केली.
जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित यांच्या ‘हंड्रेड डेज’ (1991) या सस्पेन्स चित्रपटाने त्यांना मोठा ब्रेक मिळाला. घरगुती हिंसाचारासारखा संवेदनशील विषय त्यांनी ‘अग्निसाक्षी’ (1996) या चित्रपटातून मांडला. यात नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांची मुख्य भूमिका होती. त्यानंतर ‘तिसरा कौन?’, ‘युगपुरुष’, ‘दलाल’, ‘खोटे सिक्के’, ‘जीवन युद्ध’ असे अनेक गाजलेले चित्रपट त्यांनी दिले. 2018मध्ये ‘मौसम इकरार के दो पल प्यार के’मधून त्यांनी पुनरागमन केले होते.