
कराड शहराला होत असलेला पाणीपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी कोयना नदीवरील कराड, मलकापूर, वारुंजी व उंडाळे या योजनांचे इंटरलिंकिंग करणे गरजेचे आहे, असे मत माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले.
आमदार चव्हाण यांनी पुन्हा एकदा कराडच्या पाणीप्रश्नाबाबत पालिकेच्या व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला. तसेच मीटिंगनंतर जलशुद्धीकरण केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्याधिकारी, एमजीपीचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार चव्हाण म्हणाले, ‘महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी कराड नगरपालिकेसोबत समन्वयच ठेवला नसल्याने पाणीप्रश्न उद्भवला. जुन्या जॅकवेलची यंत्रणा चालू केल्यानंतर शहराला 40 टक्के पाणीपुरवठा सुरू झाला आहे. वारुंजी येथील जॅकवेल पुन्हा चालू करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. पण, तो निर्णय होईपर्यंत पूर्ण क्षमतेने कराड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पुलावरून पाइपलाइन आणली जाईल. हे काम जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पूर्ण होणार आहे. येत्या 10 ते 15 दिवसांत शहराचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांचे सहकार्य मिळतच आहे.’ कराड शहराची लोकसंख्या वाढत असून, त्यामुळे शहराला 100 टक्के पर्यायी व्यवस्था असणारी पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे चव्हाण म्हणाले. तसेच वारुंजी येथील बंधाऱ्याची उंची वाढविण्याची गरज असल्याची मागणी विधानसभेत केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र मीटिंग लावण्याचे आश्वासन दिले होते. ती योजना जर कार्यान्वित झाली, तर कराड शहराला शुद्ध व स्वच्छ पाणी मिळेल, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले.
कोयना धरणातून थेट पाईपलाईन योजना
कराड पालिकेच्या व एमजीपीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कराड शहरासाठी कोयना धरणातून थेट पाइपलाइन योजना उपक्रम केला, तर फक्त कराड शहरालाच नव्हे, तर कोयना नदीकाठच्या सर्व गावांना स्वच्छ पाणीपुरवठा करता येईल. त्यासोबतच गुरुत्वाकर्षणामुळे कमी खर्चात हा प्रकल्प राबविता येऊ शकेल. मी मुख्यमंत्री असताना कोल्हापूरला अशीच योजना मंजूर केली होती, ती आता पूर्ण झाली आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.