संगमनेर शासकीय विश्रामगृहासमोर शेण ओतून राज्य सरकारचा निषेध, ट्रॅक्टर रॅलीस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दुधाला प्रतिलिटर 40 रुपये भाव आणि इतर मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी अकोला तालुक्यातील कोतूळ येथून संगमनेर येथील प्रांत कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली काढली. सकाळी कोतूळ येथून निघालेली ही रॅली संगमनेरमध्ये पोहोचल्यानंतर पोलिसांनी शासकीय विश्रामगृहाजवळ रोखली. यावेळी शेतकरी आंदोलकांनी ट्रॅक्टर ट्रॉलीमधून आणलेले शेण विश्रामगृहासमोर ओतून राज्य सरकारचा निषेध केला.

दुधाला प्रतिलिटर 40 रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोतूळ येथे गेले 18 दिवस शेतकरी बेमुदत सत्याग्रहाला बसले आहेत. आंदोलकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे अकोले व संगमनेर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी ‘पंजाब पॅटर्न’चे अनुकरण करीत शेकडो ट्रक्टर एकत्र करून आज जबरदस्त रॅली काढली. कोतूळ ते संगमनेर हे 55 किलोमीटरचे अंतर पार करीत 300पेक्षा जास्त ट्रॅक्टर्स आज संगमनेर शहरात धडकले.

अकोले येथे पोलीस प्रशासनाने रॅली अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संगमनेरला जायचेच, यावर आंदोलक ठाम राहिले. अखेरीस पोलीस प्रशासनानेही आंदोलकांच्या भावना लक्षात घेत रॅलीस सहकार्य केले. संगमनेर येथील मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर्सची लांबच लांब रांग उभी करीत आंदोलकांनी शासकीय कार्यालयासमोर दूध ओतून व ट्रॉलीभर शेण ओतून संताप व्यक्त केला. दुधाच्या आंदोलनाचे केंद्र असलेल्या नगर जिह्यात दुग्धविकासमंत्री राहतात. आंदोलनाच्या 18व्या दिवसानंतरही आंदोलनाची दखल घेतलेली नाही, याबद्दल आंदोलकांनी संतात व्यक्त केला. कोतूळवरून 300पेक्षा जास्त ट्रॅक्टर्स 55 किलोमीटरचे अंतर पार करीत संगमनेरला येऊ शकतात, तर अशीच ट्रॅक्टर रॅली लोणीपर्यंतही निघू शकते. किंबहुना अकोले, संगमनेर व नगर जिह्यातील सर्व संघटना व आंदोलकांना एकत्र करीत ट्रॅक्टर रॅलीचा एल्गार मंत्रालयालाही धडक देऊ शकतो. सरकारने शेतकऱ्यांवर ही वेळ आणू नये, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना निवेदन देण्यात आले. आजच्या आंदोलनानंतरही कोतूळ येथे सुरू असलेले बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असून, आंदोलन तीव्र करण्यासाठी जिह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन पुढील कृती समिती ठरविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व डॉ. अजित नवले, विनोद देशमुख, सदाशिव साबळे, अभिजित देशमुख, नामदेव साबळे, बाळासाहेब गीते, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजित भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव, योगेश बाळासाहेब देशमुख, गौरव बनोटे, सुनील आरोटे, राजेंद्र देशमाने, दीपक पवार आदींनी केले.