
मान्सूनपूर्व आणि मान्सूनने मुंबईत दमदार हजेरी लावल्यामुळे आधीच उशिरा सुरू झालेल्या नालेसफाईचा गाळ पुन्हा आल्या पावली नाल्यात वाहून गेला. मात्र हा वाहून गेलेला गाळ मुंबई महापालिकेला दिसला नाही. गाळ वाहून गेल्यानंतरही महापालिकेने 77 टक्के नालेसफाईचा दावा केला आहे. मात्र हा दावा कशाच्या जोरावर केला असून नालेसफाईसाठी अवघे 5 दिवस उरले असताना 23 टक्के नालेसफाई कशी करणार, असा सवाल करत नालेसफाईच्या आकडेवारीत गोलमाल झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधी आणि मुंबईकरांनी केला आहे.
मुंबईत पावसाळय़ापूर्वी 80 टक्के, पावसाळय़ात 10 टक्के आणि पावसाळा संपल्यावर 10 टक्के अशा तीन टप्प्यांत छोटे आणि मोठय़ा नाल्यातील गाळ काढण्यात येतो. मुंबई महापालिकेने 23 कंत्राटदारांकडे नालेसफाई आणि मिठी नदी व इतर नदी पात्रातील गाळ काढण्याची पंत्राटी कामे देण्यात आलेली आहेत. त्यासाठी पालिका तब्बल 395 कोटी रुपये खर्च करणार आहे. नालेसफाईत पारदर्शकता राहावी, यासाठी पंत्राटदारांना नालेसफाई काम सुरू करण्यापूर्वी आणि नालेसफाई कामानंतर पह्टो आणि व्हिडिओ शूटिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पालिकेच्या अभियंत्यांना कामाच्या ठिकाणी हजर राहणे बंधनकारक केले आहे. मात्र महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कामावर कडक देखरेख असतानाही नालेसफाईची कामे अत्यंत धिम्या गतीने झाली.
वाहून गेलेल्या गाळाची नोंद नाही
मुंबई मान्सूनपूर्व आणि मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी झालेल्या दमदार पावसाचा फटका मुंबईकरांना बसला. यात मिठी नदी तसेच इतर नाल्याबाहेर काढून ठेवलेला गाळ पुन्हा नदी, नाल्यात वाहून गेला. मात्र याची नोंद डॅशबोर्डवर करण्यात आलेली नाही.
मिठी नदीकाठच्या रहिवाशांना धोका
मुंबईच्या नालेसफाईचे कितीही दावे केले जात असले तरी मुंबईची नालेसफाई समाधानकारक झालेली नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. अजूनही पावसाने म्हणावा तसा जोर धरलेला नाही. मुसळधार पाऊस पडला तर मात्र मुंबईची तुंबई होण्यास वेळ लागणार नाही. दरम्यान, मिठी नदीतून आतापर्यंत केवळ 56 टक्के गाळ काढण्यात आला असून अजूनही 44 टक्के गाळ काढणे शिल्लक आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस पडला तर मिठी नदीच्या काठावर राहणाऱ्या रहिवाशांच्या घरातही पाणी शिरण्याचा धोका आहे.