Pune News – आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यावर असणारा पूल कोसळला, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ परिसरातील उदारमळा येथील हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) डाव्या कालव्यावर असणारा पूल कोसळला आहे. ही घटना सोमवार (02 जून 2025) घडली. सुदैवाने पुलावर कोणतेही वाहन अथवा पादचारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. पूस कोसळल्यामुळे या परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. कुकडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून युद्ध पातळीवर पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

महाळुंगे पडवळ येथील उदारमळा, बेंदवस्ती, घायाळमळा, आंबटकर, ठाकरवाडीतील नागरिकांना कालव्यावरील पूल हा महाळुंगे पडवळ गावात ये-जा करण्यासाठी एकमेव रस्ता आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी कुकडी पाटबंधारे विभागामार्फत अंदाजे 90 साली पूलाचे बांधकाम केले होते. या पुलावरून दररोज जवळपास मोठ्या प्रमाणावर वाहने ये-जा करतात यात विशेषतः शेतीमाल व दूध वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते, तसेच परिसरातील नागरिक व शाळकरी मुलांची या पुलावरून वर्दळ आहे. सध्या डाव्या कालव्याला सुमारे 250 क्युसेस वेगाने पाणी सुरू आहे. या पुलाचे कठडेही तुटलेले असून पूल पूर्णपणे जीर्ण झालेला आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाचे अधिक नुकसान होऊन पूल कोसळला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना सरपंच सुजाता चासकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल पडवळ, राहुल पडवळ, उदय आंबटकर, भगवान उदार, नाना घायाळ आदींनी घटनेची माहिती दिली आहे.

या परिसरातील शेतकऱ्यांचा शेती व दुग्ध व्यवसाय असल्याने हा पुल कोसळल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गवळयांना दुध गाडीपर्यत पोहोचविण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. पुलाचा राडारोडा पाण्यात कोसळल्यास कालवा फुटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने पुलाचे काम होईपर्यंत पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी. कुकडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून युद्ध पातळीवर पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी केली आहे. 2021 साली कालव्यातील पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या पिलरचे दगड निखळून नुकसान झाले होते. त्यावेळी तात्पुरती दुरुस्ती करून पुलाचे दगडी खांब दुरुस्त करण्यात आला होते. त्याच वेळेस या पुलाचे काम व्यवस्थित केले असते तर, आज हा पूल कोसळला नसता, असे शेतकऱ्यांनी सांगितले.