
राज्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालवली जात आहेत. मात्र, मानधन वेळेच्या वेळी मिळत नसल्याने अनेक आपले सरकार सेवा केंद्र चालक अडचणीत सापडले आहेत. आपले सरकार सेवा केंद्र चालकांना वीज बिलात झालेली वाढ, जागा भाडे, प्रिंटरला लागणारी शाई, पेपर याचे दर गगनाला भिडले असून हे व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत.
देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आवश्यक सार्वजनिक उपयुक्त सेवा, पीक विमा भरणे, ई-श्रम कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, जिवण प्रमाणपत्र, वाहन इन्शुरन्स, वीज बिल भरणे, हेल्थ इन्शुरन्स, आधार वरून पैसे काढून देणे, अशा सुविधा घरोघरी जाऊन आपले सरकार सेवा केंद्र मार्फत पुरवल्या जातात. मात्र मानधन वेळेच्या वेळेला मिळत नसल्याने आपल्या सरकार सेवा केंद्र चालकांमध्ये नाराजीचा सुर पाहण्यास मिळत आहे. तसेच वरिष्ठांकडून मनमानी पद्धतीने हे काम तुम्हाला करावेच लागेल, असे फर्मान काढले जाते. यामध्ये मात्र नाईलाजाने ते काम पूर्ण करावे लागत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये या अगोदर देखील आपले सरकार सेवा केंद्र चालकांना महिन्याला वीस हजार वेतन देण्यासाठी मागणी करण्यात आले होती. मात्र याकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले. वीज बिल, दुकान भाडे, हे भरणार कुठून असा सवाल आपले सरकार सेवा केंद्र चालक करीत आहेत. वरिष्ठांनी याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी आपले सरकार सेवा केंद्र चालक करीत आहेत.