
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा वाढलेला टक्का आणि मतदारांची वाढलेली संख्या याची पडताळणी करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असणारे मतदान केंद्रावरील व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ज्यांच्याकडून उत्तर हवे तेच पुरावे नष्ट करत आहेत, असे सांगत आयोगाच्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान प्रकियेशी संबंधित व्हिडीओ, सीसीटीव्ही फुटेज आणि संग्रहित फोटो निवडणुकीनंतर 45 दिवसांत नष्ट करा, असे फर्मान सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना काढले आहे. यासंदर्भातील वर्तमानपत्रातील बातमीचे कात्रण राहुल गांधी यांनी एक्स पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
मतदार यादी? मशीन-रिडेबल स्वरूपात दिली जाणार नाही. सीसीटीव्ही फुटेज? कायदा बदलून लपवले. निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ? आता 1 वर्षात नाही, 45 दिवसांत मिटवले जातील. ज्यांच्याकडून उत्तर हवे होते, ते पुरावे नष्ट करत आहेत. त्यावरून हे स्पष्टपणे दिसतंय, मॅच फिक्स आहे आणि फिक्स निवडणूक लोकशाहीसाठी विष आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.