
मध्य रेल्वेवर प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रेल्वे मंत्रालय या मार्गावर पुरेशा प्रमाणात प्रवासी सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून सुरक्षेच्या दृष्टीने विविध प्रवासी सुविधा उपलब्ध कराव्यात यासाठी शिवसेनेकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र रेल्वे मंत्रालयाला सामान्य प्रवाशांच्या गैरसोयीचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे.
शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले होते. कल्याण (ग्रामीण) येथील माजी आमदार सुभाष भोईर आणि दिवा येथील सचिन पाटील यांनी दिवा रेल्वे स्थानकावरून लोकल ट्रेन चालवण्याबाबत दिलेले निवेदन रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. कल्याण ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान राहणाऱ्या लोकांना सकाळच्या सुमारास लोकल पकडताना खूप अडचणी येतात. कर्जत, कसारा, बदलापूर, कल्याण, डोंबिवली येथून येणाऱ्या लोकल नेहमीच गर्दीने भरलेल्या असतात. दिवा येथील प्रवाशांना या गाड्यांमध्ये प्रवेश करणे मुश्कील बनते. गर्दीत लोकलमध्ये चढताना शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
या पार्श्वभूमीवर ठाणे-दिवा-पनवेल रेल्वेची नवीन सेवा सुरू करण्यात यावी. तसेच दिवा ते सीएसएमटी लोकल सेवा चालवावी याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. त्या मागणीवर रेल्वे मंत्रालय अद्याप ढिम्म असल्याने निष्पाप रेल्वे प्रवाशांचे दररोज बळी जाण्याचे सत्र सुरू राहिले आहे.