
छोट्या पडद्यापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या अनेक कलाकारांनी पुढे मोठा पडदाही गाजवला. आपल्या अभिनयाच्या जोरावर या कलाकारांनी मान, सन्माम, पैसा मिळवला. यापैकी एक म्हणजे अभिनेत्री श्वेता तिवारी. टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या श्वेताने नंतर बॉलिवूडमध्येही आपली ओळक बनवली. तिने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे. कामासह तिच्या खासगी आयुष्याचीही नेहमी चर्चा होते.
श्वेता तिवारी हिची दोन लग्न झाली, पण दोन्ही फार काळ टिकली नाहीत. पहिले लग्न तिने 19 वर्षांची असताना राजा चौधरी यांच्याशी केले होते. मात्र दोघांतील हे नाते जास्त काळ टिकले नाही आणि दोघांनी घटस्फोट घेतला. श्वेताने राजावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यामुळे राजा चौधरीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आता याच राजाने ताज्या मुलाखतीमध्ये श्वेता तिवारीबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत.
राजा चौधरी याने ‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्वेता तिवारी आणि तिचा दुसरा पती अभिनव कोहली यांच्यातील संबंधांवर भाष्य केले. अभिनव कोहली याची ओळख तिने भाऊ म्हणून केली होती आणि नंतर त्याच्याच सोबत रोमँटिक झाली, असे राजाने सांगितले.
ती सर्वांनाच भाऊ म्हणायची. अभिनव कोहलीलाही भाऊ.. भाऊ म्हणायची. त्यानंतर तोच तिचा प्रियकर बनला आणि दोघांनी लग्नही केले, असे राजा चौधरीने सांगितले. तसेच श्वेता मला आमच्या मुलीलाही भेटू देत नव्हती. याच अटीवर तिने घटस्फोट घेतला होता, असा खुलासाही राजाने केला.
अभिनव आधी राजा आणि श्वेता तिवारी यांचा 1998 मध्ये विवाह झाला होता. 2007 मध्ये दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि 2012 ला अधिकृतपणे वेगळे झाले. त्यानंतर 2013 ला तिने अभिनव कोहलीशी लग्न केले. 2016 मध्ये श्वेताने रेयांश कोहलीला जन्म दिला. मात्र अभिनव सोबतही तिचे लग्नही टिकले नाही आणि दोघांनी 2019 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला.