
ऐतिहासिक पतितपावन मंदिरातून भजनीबुवांना भाजप नेते अॅड.बाबा परूळेकर यांनी रोखल्यानंतर रत्नागिरीत वातावरण पेटले होते. भजनीबुवांनी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करूनही रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश शिवरकर यांनी गुन्हा दाखल केला नाही. उलट भजनीबुवांच्या अर्जाला केराची टोपली दाखवली आहे. यामुळे शहर पोलीस निरीक्षकांचा भाजप नेते अॅड. बाबा परूळेकर यांना वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप होत आहे. याबाबत भजनीबुवांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची भेट घेत याबाबत तक्रार केली.
भागोजीशेठ कीर यांनी पतितपावन मंदिर उभारून मंदिर सर्व धर्मियांसाठी खुले केले होते. सर्व धार्मियांसाठी खुले केलेले देशातील हे पहिले मंदिर होते. त्याच पतितपावन मंदिरात 26 एप्रिल रोजी भजनासाठी गेलेल्या भजनीबुवांना भाजप नेते अॅड. बाबा परूळेकर यांनी अटकाव केल्याची तक्रार भजनीबुवांनी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे केली होती. मात्र रत्नागिरी शहर पोलिसांकडून त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
नवीन पोलीस अधीक्षकांकडून अपेक्षा
रत्नागिरीत नूतन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची भजनीबुवांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट घेऊन 26 एप्रिल रोजी पतितपावन मंदिरात झालेला प्रकार सांगितला. भजनीबुवांनी निवेदनही दिले आहे.तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केल्यानंतरही रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश शिवरकर यांनी भाजप नेते अॅड. बाबा परूळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. आपण शहर पोलीस निरीक्षकांना कायदेशीर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना द्या्व्यात अशी मागणी भजनीबुवा आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिले.
शहर पोलिसांचा फुकटचा सल्ला
सामाजिक सलोखा बिघडवणारी घटना घडूनही रत्नागिरी शहर पोलिसांनी पतितपावन मंदिरात भजनीबुवांना मज्जाव करणाऱ्या भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल केलाच नाही. उलट धर्मादाय आयुक्तांकडे जाऊन दाद मागा असा फुकटचा सल्ला शहर पोलिसांनी भजनीबुवांना दिल्यामुळे संतापाची लाट पसरली आहे.