Ratnagiri News – गॅस टर्मिनलला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांशी पालकमंत्री का संवाद साधत नाहीत?

नांदिवडे येथे जिंदाल कंपनी उभारत असलेल्या गॅस टर्मिनल संदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावलेल्या बैठकीला स्थानिक ग्रामस्थांना बोलावले नाही. स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा न करता पालकमंत्री उदय सामंत ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गॅस टर्मिनलचे काम करा असे कसे सांगू शकतात? मुळात गॅस टर्मिनल नांदिवडे गावातून हद्दपार करा अशी ग्रामस्थांची मागणी आहे, असे आंदोलक काजल नाईक म्हणाल्या.
नांदिवडे येथील जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनल विरोधात ग्रामस्थांचे 14 एप्रिल पासून आंदोलन सुरू आहे. प्रहार जनशक्ती पक्षाने जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनल विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देताच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने गॅस टर्मिनल उभारण्यासाठी आवश्यक परवानगी नसल्याचे कारण सांगून जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनलचे काम थांबवले होते. त्यानंतर जिंदाल कंपनीने गॅस टर्मिनलचे पुन्हा काम सुरू केले होते. मात्र ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले. त्यानंतर 19 जून रोजी जयगड येथे झालेल्या बैठकीतही ग्रामस्थांनी गॅस टर्मिनलला तीव्र विरोध केला. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनल संदर्भात एक बैठक बोलवली होती. या बैठकीला ग्रामस्थांना पूर्वनियोजित निमंत्रण देण्यात आले नसल्याचा आरोप काजल नाईक यांनी केला आहे.
काजल नाईक म्हणाल्या की, मी ठाण्यात रहात असले तरी मी नांदिवडे गावची रहिवासी आहे म्हणूनच मी हे गॅस टर्मिनल विरोधात आंदोलन पुकारले आहे. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गॅस टर्मिनल संदर्भात सायंकाळी 4 वाजता बैठक बोलवली आणि त्यांच्या कार्यकर्त्याचा आम्हाला दीड वाजता फोन येतो की बैठकीला या. जयगड वरून दोन-अडीच तासात ग्रामस्थ कसे पोहचणार? सर्व ग्रामस्थ रोजंदारीवर कामाला गेलेले ते कसे बैठकीला येणार? जर बैठक पूर्वनियोजित होती तर आम्हाला पूर्वनियोजित निमंत्रण का दिले नाही? असा सवाल काजल नाईक यांनी उपस्थित केला आहे.