
सैनिकी परंपरा असलेला तालुका म्हणून खेड तालुक्याची खरी ओळख आहे. याच खेड तालुक्यातील सैनिकांनी विविध युद्धात आपल्या शौर्याचा पराक्रम गाजवला आहे. शिवाय अनेक जण भारत मातेच्या रक्षणासाठी प्रसंगी कामी आले आहेत. शुरवीरांची थोर सैनिकी परंपरा पहिल्या महायुद्धापासून सुरू होत असली, तरी आजही खेड तालुक्यातील अनेक गावातील तरुण हे सैन्यात सेवा बजावत आहेत. अनेकजण सैन्यदलात दाखल होत आहेत. पुरुषांसोबत महिलाही मोठ्या संख्येने सैन्यदलात दाखल होत आहेत. यामध्ये खेड तालुक्यातील बोरज गावच्या ऋतुषा राजेंद्र सनगरे हिचा सुद्धा आता समावेश झाला आहे. हिंदुस्थान-बांगलादेश सीमेचे रक्षण करण्यासाठी नुकतीच तिची पोस्टींग झाली आहे. यामुळे बोरज गावासह तालुक्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
ऋतुजा राजेंद्र सनगरे या महिला सैनिकाचा जन्म खेड तालुक्यातील बोरज येथे झाला झाला असून तिचे प्राथमिक शिक्षण आदर्श शाळा निगडे बोरज नं.1 या शाळेत इयत्ता सातवी पर्यंत झाले. त्यानंतर पुढील माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल बोरज येथे पूर्ण झाले तर उच्च शिक्षण पद्मश्री अण्णासाहेब बेहरे ज्युनिअर कॉलेज लवेल येथे झाले. उच्च शिक्षण घेत असतानाच तिने हिंदुस्थान सैन्य दलात सैनिक म्हणून जाण्याचा दृढ निश्चय केला.
ऋतुजाने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या सल्ला आणि मार्गदर्शनाने सन 2023 मध्ये नॅशनल अकॅडमी कॅम्प बोरज येथील अकॅडमीत प्रवेश घेतला. अकॅडमीचे संचालक आणि पिटी शिक्षक किशोर आदावडे आणि दिक्षिता आदावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पोलीस भरती, वनरक्षक, होमगार्ड आदिसाठी प्रयत्न केले, मात्र तिचं ध्येय सैन्य दलात जायचं होत. सैन्य दलाच जाण्याचा ऋतुजाचा प्रयत्न 14 डिसेंबर 2024 रोजी तिच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने सफल झाला आणि तिची बीएसएफ हिंदुस्थान सैन्याची ट्रेनिंग ही खडका कॅम्प पंजाब येथे लागली. तिथे तिने 13 महिन्यांचे खडतर ट्रेनिंग अथक परिश्रमाने यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यामुळे तिची पोस्टिंग आसाम गुवाहटी येथील हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवरती झाली असून भारत मातेच्या रक्षणासाठी एक सैनिक म्हणून ती 19 फेब्रुवारी 2026 रोजी रुजू होणार आहे.






























































