
खंडाळ्यातील दुर्वास पाटीलने गेल्या दीड वर्षात केलेले तिहेरी हत्याकांड रत्नागिरी शहर पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले आहे. या तिहेरी हत्याकांडाने रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. आरोपी दुर्वास पाटील याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने प्रेयसी भक्ती मयेकर हिची हत्या केली. या घटनेनंतर सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची भेट घेतली. तिहेरी हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी शिवसेनेने यावेळी निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी तिहेरी हत्याकांड उघड करणाऱ्या रत्नागिरी पोलिसांचे अभिनंदन केले. तसेच ही घटना गंभीर असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. तसेच संगमेश्वर येथील एका तरूणाने आत्महत्या केली. त्या प्रकरणात त्या तरूणाच्या मोबाईलमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, मात्र तो मोबाईल हरवला असल्याचे पोलीस सांगत असल्याची तक्रार बाळ माने यांनी मांडली.
सात दिवसात चार्जशीट दाखल करण्याच्या सूचना
महिलांसंदर्भातील सर्वच गुन्ह्यामध्ये आम्ही ते प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावे अशी विनंती करतो. या प्रकरणातही तशी विनंती करणार असून सात दिवसांत चार्जशीट दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घडलेली गंभीर आहे. या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावरही कारवाई करू असे आश्वासन नितीन बगाटे यांनी दिले.



























































