
आज एकाच क्षणी हिंदुस्थानातील अब्जावधी क्रिकेटप्रेमींनी स्वप्नपूर्तीचा आनंद आणि स्वप्नभंगाचे हुंदके अनुभवले. गेली 18 वर्षे जेतेपदाचे स्वप्न उराशी घेऊन लढणाऱ्या बंगळुरूचे पहिल्यावहिल्या आयपीएल जेतेपदाची विराट स्वप्नपूर्ती झाली. विराट कोहलीच्या संयमी 43 धावांच्या खेळीमुळे उभारलेले 191 धावांचे आव्हान रोखण्यात बंगळुरूच्या गोलंदाजांनी यश मिळवले. शशांक सिंगच्या 30 चेंडूंतील 61 धावांच्या झुंझार आणि झंझावाती खेळीनंतरही पंजाबचे पहिल्या जेतेपदाचे स्वप्न अवघ्या 6 धावांनी भंगले आणि बंगळुरूच्या रूपाने आयपीएला नवा चॅम्पियन लाभला.
पंजाबची लाजबाव सुरुवात
बंगळुरूचे 191 धावांचे आव्हान फॉर्मात असलेला पंजाब हसत खेळत गाठेल, असे साऱ्यांचे अंदाज होते. सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन यांनी 43 धावांची दक्यात सलामी दिली. मात्र ही जोडी फुटल्यानंतर हातातून वाळू निसटावी तसा हळूहळू सामनाही निसटला.
एकामागोमाग आत्मघाती फटके
सलामीची जोडी फुटल्यानंतर श्रेयस अय्यर आला आणि पंजाबची छाती फुगली होती. सारेच अय्यरकडून पुन्हा झंझावाती खेळीची अपेक्षा करत होते, पण तो दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला आणि पंजाबच्या चाहत्यांच्या छातीत धस्स झाले. जोश इंग्लिसने 4 षटकार खेचून पंजाबच्या संघात जोश आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा षटकाराचा फटका आत्मघाती ठरला. तो 39 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर सारेच आत्मघाती फटके खेळून बाद होते गेले. भुवनेश्वरच्या एकाच षटकात नेहाल वढेरा आणि मार्कस स्टॉयनिसने आपली विकेट फेकली. 6 बाद 142 अशा स्थितीत पोहोचलेल्या पंजाबला 20 चेंडूंत 49 धावांची गरज होती. त्यातच यश दयालने 18 व्या षटकात अझमतुल्लाहची विकेट काढत केवळ 5 धावा दिल्या.
कोहलीच्या 35 चेंडूंत 43 धावा
एकीकडे वैभव सूर्यवंशीच्या बॅटमधून 35 चेंडूंत 101 धावांचा पाऊस पाडला जातो तर तितक्याच चेंडूंत विराट कोहलीला केवळ 43 धावाच पळता आल्या. बंगळुरूला मोठी धावसंख्या उभारून देण्याच्या ध्येयाने फिल सॉल्ट आणि विराट कोहली ही यशस्वी सलामीची जोडी मैदानात उतरली खरी, पण दोघांनीही अपेक्षाभंग केला. सॉल्टने अर्शदीपच्या पहिल्या षटकात 13 धावा काढल्या पण तो दुसऱ्याच षटकात कायल जेमिसनचा बळी ठरला. त्यानंतर जो कुणी आला त्याने वन डे स्टाईल फलंदाजी केली. परिणामतः बंगळुरू आपल्या 250 धावांच्या लक्ष्यापासून आपोआप दूर फेकली गेली.
मधल्या फळीचा सामान्य खेळ
सॉल्टची विकेट गेल्यानंतर कोहली तब्बल तासभर मैदानात होता, पण तो प्रचंड सावध खेळला आणि त्याने घोर निराशा केली. त्याच्या बॅटमधून षटकार सोडा, चौकारही निघत नव्हते. त्याने मयांक अगरवालसह (24) दुसऱ्या विकेटसाठी 38, कर्णधार रजत पाटीदारबरोबर (26) तिसऱया विकेटसाठी 40 आणि लियाम लिव्हिंगस्टोनच्या (25) साथीने 35 धावांची भर घातली. कोहली तब्बल 15 षटके मैदानात उभा राहिला.
शशांकची झुंजार खेळी
2 षटकांत 42 धावांचे आव्हान होते. खेळपट्टीवर एकटा शशांक सिंग होता. त्याने भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर 13 धावा काढल्या. त्यामुळे पंजाबचा पराभव निश्चित झाला. सहा चेंडूंत 29 धावा कठीण होत्या. त्यातच हेझलवूडने पहिल्या दोन चेंडूंवर शशांकला मोठ्या फटक्यापासून रोखत बंगळुरूचे जेतेपद निश्चित केले. त्यानंतर शशांकने 6, 4, 6, 6 फटके मारत पराभवाचे अंतर 6 धावांवर आणले. त्याने या खेळीत 6 षटकार आणि 3 चौकार ठोकले.
कोहलीचे विराट आनंदाश्रू
शेवटच्या षटकातील हेझलवूडचे दोन चेंडू निर्धाव गेल्यानंतर विराट कोहलीचे डोळे अक्षरशः पाणावले. कारण होते बंगळुरूचा विजय निश्चित झाला होता. 4 चेंडूंत 29 धावा करणे अवघड असल्यामुळे विराटच्या दृष्टीने 18 वर्षांनंतर स्वप्न साकार झाल्याची भावना होती. त्यामुळेच त्याचे डोळे पाणावले.
कधी वाटलं नव्हतं, हा दिवस येईल – विराट कोहली
हा विजय संघाइतकाच चाहत्यांचाही आहे. मी माझं तारुण्य, माझा पिढीचा सर्वोत्तम काळ आणि अनुभव या माझ्या संघाला दिला. प्रत्येक हंगामात जिंकण्याचा प्रयत्न केला. मी शक्य ते सगळं दिलं. कधी वाटलंच नव्हतं की, हा दिवस येईल. जेव्हा आम्ही जिंकलो तेव्हा माझ्या भावना अनावर झाल्या.
‘हा विजय माझ्यासाठी फार मोठा आहे. मी या संघाशी कायम प्रामाणिक राहिलो. काही क्षण कठीण आले, पण मी संघाबरोबर राहिलो आणि संघही माझ्या पाठीशी राहिला. माझं मन बंगळुरूमध्ये आहे, माझं आत्मादेखील बंगळुरूसोबतच आहे. ही स्पर्धा खूप उच्च दर्जाची असते. अशा मोठ्या स्पर्धा आणि क्षण मी जिंकायचं स्वप्न पाहतो. आज रात्री मी एखाद्या लहान बाळासारखा शांतपणे झोपेन.’
अर्शदीपच्या 5 चेंडूंत 3 विकेट
19 व्या षटकात रोमारियो शेफर्ड सलग चौकार-षटकार मारत बंगळुरूला दोनशे धावांचे स्वप्न दाखवले. त्यानंतर पहिल्या 3 षटकांत 37 धावा मोजणाऱ्या अर्शदीपने आपल्या या शेवटच्या षटकांत कमाल गोलंदाजी करताना पाच चेंडूंत शेफर्ड, कृणाल पंड्या आणि भुवेनश्वर कुमार यांच्या विकेट काढत बंगळुरुला 190 धावांवरच रोखले. त्याने केवळ 3 धावा देत 3 विकेट टिपल्या. त्याच्या या कामगिरीमुळेच बंगळुरूला धावांचे द्विशतकही गाठता आले नाही. त्याआधी कायल जेमीसननेही 3 विकेट टिपल्या.
विराटच्या यशनामावलीत आयपीएलही
विराट कोहलीला आपल्या कारकीर्दीच्या प्रारंभीच वन डे वर्ल्ड कप उंचावण्याचे भाग्य लाभले. 2011 साली हिंदुस्थान जगज्जेता झाला तेव्हा कोहलीसुद्धा संघात होता. त्यानंतर त्याने गेल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप जिंकला आणि या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीही पटकावली. मात्र गेली 17 वर्षे आयपीएलची ट्रॉफी त्याला हुलकावणी देत होती. अखेर 18 क्रमांकाची जर्सी घालून गेली 18 वर्षे आयपीएल खेळत असलेल्या कोहलीची विराट स्वप्नपूर्ती 18 व्या वर्षीच झाली आणि त्याच्या जेतेपदांच्या पंक्तीत आयपीएलनेही स्थान मिळवले. विशेष म्हणजे विराटने बंगळुरूसाठी सर्वाधिक 657 धावा करत मोलाची कामगिरी बजावली. त्याने या धावांमध्ये सर्वाधिक 8 अर्धशतके झळकावली.
3 उपविजेतेपदानंतर पहिले जेतेपद
बंगळुरूच्या संघाने आठवेळा प्ले ऑफ गाठले. तीनवेळा अंतिम फेरीही गाठली, पण त्यांच्या कपाळी कधीही जेतेपदाचा टिळा लागला नव्हता. अखेर 18 वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी आपले सारे अपयश धुऊन काढले आणि आपले पहिले जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. बंगळुरूच्या रूपाने आयपीएलला नवा विजेता लाभला. तो आयपीएल जिंकणारा सातवा संघ ठरला. याआधी मुंबई आणि चेन्नईने प्रत्येकी पाच-पाच, कोलकात्याने तीन, हैदराबादने दोन तर राजस्थान, गुजरातने प्रत्येकी एक-एक जेतेपद पटकावले आहे.
दोन्ही कॅप गुजरातलाच
आयपीएलची ‘ऑरेंज कॅप’ अपेक्षेप्रमाणे 759 धावा करणाऱ्या साई सुदर्शनने तर 25 विकेट टिपणाऱ्या प्रसिध कृष्णाने ‘पर्पल कॅप’ला आपल्या डोक्याची शान बनवली. हे दोन्ही सर्वोत्तम खेळाडू गुजरातचे आहेत आणि दोन्ही कॅप एकाच संघाच्या दोन्ही खेळाडूंनी जिंकण्याचा पराक्रम याआधी चेन्नई, हैदराबाद आणि राजस्थान या संघांच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी केली होती. 2013 साली चेन्नईसाठी माइक हसी (733 धावा) आणि ड्वेन ब्राव्होने (32 विकेट) तर 2017 मध्ये डेव्हिड वॉर्नर (641) आणि भुवनेश्वर कुमार (23 विकेट) यांनीही हैदराबादसाठी तर 2022 साली राजस्थानच्या जोस बटलर (863) आणि युझवेंद्र चहल (27 विकेट) यांनी ‘ऑरेंज’ आणि ‘पर्पल कॅप’ जिंकली होती.
विक्रम आयपीएलच्या 18 व्या हंगामाचे
- विराट कोहलीने 8 अर्धशतके ठोकताना आयपीएलमधील डेव्हिड वॉर्नरचा 66 अर्धशतकांचा विक्रम मोडीत काढला. आता कोहली 71 अर्धशतकांसह आघाडीवर आहे.
- आयपीएलमध्ये 7 हिंदुस्थानींना तर केवळ 2 परदेशी खेळाडूंना शतके ठोकता आली.
- हैदराबादने आपल्या सलामीच्या सामन्यात 286 धावांचा तर आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात 278 धावांचा पाऊस पाडला. या दोन्ही धावसंख्या वगळता एकाही संघाला अडीचशेचा टप्पा ओलांडता आला नाही.
- हैदराबादने 278 धावांचा डोंगर रचताना कोलकात्याचा डाव 168 धावांत गुंडाळत 110 धावांनी विजय नोंदवला. हा आयपीएलमधील सर्वात मोठा विजय ठरला.
- मुल्लानपूर येथे झालेल्या सामन्यात पंजाबने कोलकात्याला 95 धावांत गुंडाळले. हीच धावसंख्या आयपीएलमधील एकमेव शंभरीतली सांघिक धावसंख्या ठरली.
- ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात कोलकात्याने 207 धावांचा पाठलाग करणाऱ्या राजस्थानला 205 धावांवर रोखत अवघ्या एका धावेने थरारक विजय नोंदवला.
- रोहित शर्माने गुजरातविरुद्ध सामन्यात 81 धावांची खेळी करताना सात हजार आयपीएल धावांचा विक्रम केला. तो विराट कोहलीनंतर (8618) सात हजार धावा करणारा पहिलाच फलंदाज आहे. आता त्याच्या नावावर 7046 धावा आहेत.
- आयपीएल इतिहासात प्रथमच 11 फलंदाजांनी 500 पेक्षा अधिक धावा केल्या. यात 6 फलंदाजांनी 600 धावांचा टप्पा गाठला. हासुद्धा एक आयपीएल विक्रमच आहे.
- हैदराबादच्या अभिषेक शर्माने पंजाबविरुद्ध 55 चेंडूंत 141 धावांची तर मिचेल स्टार्कने 35 धावांत 5 विकेट घेत यंदाच्या आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी साकारली. हार्दिक पंड्यानेही 36 धावांत 5 विकेट टिपले.
- 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने 38 चेंडूंत 101 धावांची खेळी ठोकताना त्याने जगातील सर्वात तरुण शतकवीराचाही मान मिळवला. त्याने या खेळीत 11 षटकारही ठोकले.
- ग्लेन मॅक्सवेल 25 मार्चला गुजरातविरुद्ध साई किशोरच्या चेंडूवर शून्यावर पायचीत झाला आणि त्याने दिनेश कार्तिक आणि रोहित शर्माच्या 18 भोपळ्यांचा दुर्दैवी विक्रम मोडीत काढला. हे दोघे अडीचशेपेक्षा अधिक सामन्यांमध्ये 18 वेळा शून्यावर बाद झाले तर मॅक्सवेलने 135 व्या सामन्यातच हा विक्रम मागे टाकला.
- शुभमन गिल आणि साई सुदर्शनने दिल्लीविरुद्ध 205 धावांची अभेद्य भागी रचत गुजरातला दहा विकेट्सनी मोठा विजय मिळवून दिला. ही आयपीएलमधील सातवी द्विशतकी भागी असून या जोडीची ही दुसरी द्विशतकी सलामी ठरली.