स्वस्त, परवडणाऱ्या घरांची मागणी 23 टक्क्यांनी घटली, 50 कोटींवरील आलिशान फ्लॅट्सची विक्री जोरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai real estate record 1.5 lakh homes sold in a year, govt earns rs 13,487 crore revenue

हिंदुस्थानातील स्थावर मालमत्ता बाजारातील अलीकडील तेजी काही प्रमाणात मंदावत असल्याचे दिसते. नाईट फ्रँकच्या अहवालानुसार २०२६ च्या पहिल्या तिमाहीत देशभरातील आठ प्रमुख शहरांमधील घरांच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत ४% घट झाली आहे.

गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ८८,३६१ घरांच्या तुलनेत, या कालावधीत एकूण ८४,८२७ घरांची विक्री झाली. बाजार तज्ज्ञांच्या मते ही घट म्हणजे दीर्घकाळच्या वेगवान वाढीनंतर बाजारपेठ पूर्वपदावर येत असल्याचे लक्षण आहे. मात्र, या मंदीमागे जागतिक घटकही महत्त्वाचे आहेत. परवडणाऱ्या घरांची मागणी २३ टक्क्यांनी घटली, परंतु ५० कोटी रुपयांच्या आलिशान फ्लॅट्सची विक्रीत तेजी आली आहे. परवडणाऱ्या घरांच्या विक्रीतील घट हे स्पष्टपणे दर्शवते की, मध्यमवर्ग सध्या खरेदी करताना सावधगिरी बाळगत आहे, तर उच्चभ्रू वर्ग महागड्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावासारख्या भू-राजकीय संकटांमुळे गुंतवणूकदार आणि सामान्य खरेदीदारांमध्ये आर्थिक अनिश्चिततेची भावना निर्माण झाली आहे. यामुळेच खरेदीदार आता मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी wait and watch धोरण अवलंबत आहेत. त्यामुळे मालमत्ता बाजारात मंदी आली आहे.

बाजारात स्वस्त किंवा बजेटच्या घरांची मागणी कमी होत असून प्रीमियम आणि लक्झरी घरांकडे कल वाढत आहे. ५० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीत २३% ची लक्षणीय घट झाली असताना १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांची मागणी ११% ने वाढली आहे. विशेषत १ ते २ कोटी रुपयांच्या घरांचा एकूण विक्रीत २९% वाटा होता. श्रीमंतांमध्ये अति-आलिशान घरांची क्रेझ इतकी वाढली आहे की, २० कोटी ते ५० कोटी दरम्यान किंमत असलेल्या सुपर-प्रीमियम सेगमेंटमधील विक्रीत तब्बल ८०% वाढ झाली आहे.

यावर्षी देशातील प्रमुख रिअल इस्टेट बाजारपेठांच्या कामगिरीत लक्षणीय चढ-उतार दिसून आला आहे. मुंबईसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये विक्री ७% ने घसरून २३,१८५ युनिट्सवर आली, तर दिल्ली-एनसीआर आणि पुणे या दोन्ही ठिकाणी तब्बल ११% घट झाली. याउलट, दक्षिण हिंदुस्थानातील शहरांमध्ये जास्त मागणी राहिली. बंगळूरमध्ये विक्री ५%, हैदराबादमध्ये १% आणि चेन्नईमध्ये ९% ने वाढली. याशिवाय, अहमदाबाद आणि कोलकाताच्या बाजारपेठांमध्येही सकारात्मक वाढ नोंदवली गेली.

नवीन घरांच्या पुरवठ्याबाबत बोलायचे झाल्यास, या तिमाहीत २% ची किंचित घट झाली असून, एकूण ९४,८५५ युनिट्स बाजारात आणण्यात आले आहेत. बंगळूर, चेन्नई आणि अहमदाबाद वगळता इतर सर्व शहरांमध्ये नवीन प्रकल्पांचे प्रक्षेपण मंद राहिले. एनसीआरमध्ये नवीन प्रकल्पांच्या प्रक्षेपणात सर्वाधिक ८% घट दिसून आली, तर हैदराबाद आणि कोलकातामध्ये प्रत्येकी ६% घट झाली. मुंबई आणि पुणे येथे तुलनेने कमी, अनुक्रमे १% आणि ५% घट दिसून आली.

घरांच्या विक्रीत घट होऊनही, मालमत्तेच्या किमती कमी झालेल्या नाहीत आणि त्या उच्च पातळीवर आहेत. नाईट फ्रँकच्या अहवालानुसार, दिल्ली-एनसीआरमधील गाझियाबाद आणि ग्रेटर नोएडा येथे किमतींमध्ये अनुक्रमे १३% आणि ११% अशी सर्वाधिक वाढ झाली. त्याच वेळी, मुंबई हे भारतातील सर्वात महागडे निवासी बाजारपेठ आहे, जिथे मालमत्तेचे सरासरी दर प्रति चौरस फूट ३६,०४९ पर्यंत पोहोचले आहेत.