
शेवटच्या दिवशी बॅझबॉलपुढे जसप्रीत बुमरा फिका पडला. इंग्लंडच्या फलंदाजांनी बुमराचा मान ठेवत त्याच्यापुढे बचावात्मक खेळ करण्याची त्यांची रणनीती फायद्याची ठरली. बुमराला पाचव्या दिवशी 16 षटके गोलंदाजी देण्यात आली, पण त्याला एकही विकेट टिपता आले नाही. त्याच्या अपयशामुळे हिंदुस्थानची गोलंदाजी अधिक बोथट वाटली आणि 371 धावांच्या आव्हानाचाही बचाव करू शकली नाही. त्यातच दुसऱया कसोटीत बुमराशिवायच हिंदुस्थानी संघ उतरणार असल्याचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आधीच स्पष्ट केल्यामुळे हिंदुस्थानच्या संघव्यवस्थापनाची ही भूमिका मालिकेत दुसऱया पराभवाला आमंत्रण देणारी ठरणार असल्याचे आतापासूनच बोलले जात आहे.
हेडिंग्ले कसोटीत एकटा बुमरा सोडला तर हिंदुस्थानच्या एकाही वेगवान गोलंदाजाचा मारा इंग्लंडच्या फलंदाजांना त्रासदायक वाटला नाही. प्रसिध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर याची गोलंदाजी पाहून त्यांना दुसऱया कसोटीत खेळविण्याबाबतच शंका उपस्थित झाली आहे. अशा परिस्थितीत वर्कलोडच्या नावाखाली बुमराला विश्रांती देण्याचा निर्णय हिंदुस्थानला महागात पडू शकतो, याबाबत हिंदुस्थानी संघव्यवस्थापनाने आतापासूनच विचार करायला हवा. बुमरानंतर मोहम्मद सिराज हाच एकमेव अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. मात्र त्यालाही आपला भेदक मारा करण्यात अद्याप यश लाभलेले नाही. प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून हिंदुस्थानी संघाला एकामागोमाग धक्के बसताहेत.
फक्त बांगलादेशविरुद्धचा मालिका विजय सोडला तर गेल्या नऊ कसोटींत हिंदुस्थानला सातवा पराभव सहन करावा लागला आहे. केवळ पर्थच्या एकमेव कसोटीत हिंदुस्थानला विजय नोंदविता आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या हेडिंग्ले कसोटीत हिंदुस्थान सुस्थितीत असतानाही पराभूत झाल्यामुळे हा विजय हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींच्या जिव्हारी लागलाय, मात्र या पराभवाचे शल्य हिंदुस्थानी संघाला किती बोचले याबाबत शंका आहे. या पराभवाचे खापर गंभीर यांनी कोणावरही फोडले नसले तरी आपलं आधीच ठरल्याप्रमाणे बुमराला विश्रांती देणार असल्याचे त्यांच्या वक्तव्यामुळे इंग्लिश संघाने नक्कीच सुटकेचा निश्वास सोडला असेल.
गंभीर यांनी पराभवानंतर स्पष्ट केले की, बुमराला अजून खूप खेळायचे आहे. त्याच्यावर आम्ही कोणताही अधिक दबाव देणार नाही आणि आम्ही आमच्या योजनेनुसार इंग्लडमध्ये खेळणार. मात्र बुमरा कोणत्या दोन कसोटी खेळणार हे अद्याप अनिश्चित आहे. मात्र बुमराच्या अनुपस्थितीशिवाय एजबॅस्टनवरही हिंदुस्थानला पराभवाचा धक्का बसला तर सलग तिसऱया मालिका पराभवापासून हिंदुस्थानला कुणीही रोखू शकणार नाही याबाबतही संघाने विचार करायला हवा.