वीस दिवसानंतरही कोणतीही कारवाई नाही, त्यामुळे संशय बळावतोय – रोहित पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यावर घातपाताची शक्यता व्यक्त करत केंद्रीय तपास संस्थांकडून चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. दरम्यान अजित पवार यांच्या मृत्यूला वीस दिवस झाले तरी अद्याप VSR कंपनीवर कारवाई झालेली नाही तसेच DGCA ने देखील चौकशी अहवाल दिलेला नाही. त्यावरून रोहित पवार यांनी ट्विट करत संशय बळावत असल्याचे म्हटले आहे.

”स्व.दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा दिवस असून अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही, तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही, परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे DGCA ने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसेच VSR वर योग्य ती कारवाई करावी”, असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची केंद्रीय तपास संस्थांकडून चौकशी केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली होती. त्यानंतर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी एअरक्राफ्ट ऑक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून (एएआयबी) या अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.