संविधानातून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवा, संघाच्या दत्तात्रेय होसबाळे यांची वादग्रस्त भूमिका

संविधानाच्या प्रस्तावनेत असणारे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द हटविण्यात यावेत, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी मांडली आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. होसबाळे यांच्या भूमिकेतून भाजप आणि संघाचा संविधान बदलाचा छुपा अजेंडा सर्वांसमोर आल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

देशाच्या मूळ संविधानात समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द नव्हते. आणीबाणीच्या काळात देशात संसद आणि न्यायपालिका दोन्ही कार्यरत नव्हती. यावेळी कॉँग्रेस सरकारने हे दोन शब्द संविधानात जोडले होते. संसदेच्या संमतीशिवाय संविधानाच्या प्रास्ताविकेत जोडलेले समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द राहावेत की नाही यावर चर्चा झाली पाहिजे, अशी भूमिका संघाच्या दत्तात्रेय होसबाळे यांनी आणीबाणीच्या 50 वर्षांच्या निमित्ताने दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात मांडली.

आरएसएसचा बुरखा फाटला

आरएसएसचा बुरखा पुन्हा फाटला आहे. संविधान यांना टोचते कारण ते समानता, धर्मनिरपेक्षता आणि न्यायाबद्दल बोलते. त्यांना दलित आणि गरीबांना पुन्हा गुलाम बनवायचे आहे, असे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले.

हिंदू राष्ट्र बनवण्याचा डाव

संघ-भाजप वंचित व बहुजनांच्या विरोधात आहेत. ये लातो के भूत बातोसे नही मानेंगे. भारताला हिंदुराष्ट्र बनविण्याचा त्यांचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले