
मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू आहे. ही राजवट दूर करून तेथे सरकार स्थापन करायचे व मुख्यमंत्र्यांच्या शपथग्रहण सोहळ्यास (म्हणजे ‘सिंदूर उत्सवा’स) पंतप्रधान मोदींसह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाने उपस्थित राहायचे, असे राजकारण दिल्ली व मणिपूरच्या राजभवनात शिजत आहे. पंतप्रधान मोदी यांनी संकटकाळात मणिपूरच्या जनतेला धीर देण्याचे कर्तव्य पार पाडले नाही. आता पंतप्रधान मणिपुरात जातील ते भाजपचे राजकारण यशस्वी करण्यासाठी. हा सर्व प्रकार राजकीयदृष्ट्य घृणास्पद आहे. शेकडो मणिपुरी जनतेच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार धक्कादायक आहे. पंतप्रधान मणिपुरात जाऊ शकतात, पण का, तर एका राजकीय उत्सवात भाग घेण्यासाठी!
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सध्या नक्की काय चालले आहे हे लपून राहिलेले नाही. पंतप्रधान जागोजाग शासकीय इतमामाने ‘सिंदूर यात्रे’त सहभागी होत आहेत. गुजरातमध्ये ‘सिंदूर यात्रा’ पार पडल्यावर आता पंतप्रधानांच्या उपस्थितीत ‘सिंदूर यात्रा’ व ‘सिंदूर रोड शो’चे आयोजन बिहारमध्ये केले आहे. पंतप्रधान दोन दिवस पाटणा वगैरे भागात ‘सिंदूर रोड शो’ करतील. त्यानंतर इतर राज्यांत जातील. जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवडय़ात भाजप कार्यकर्ते घराघरांत ‘सिंदूर’ घेऊन जातील. तशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याआधी राममंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने घराघरांत अक्षता पोहोचवण्याचा कार्यक्रम झाला होता. त्याआधी गंगाजल गावोगाव फिरविण्यात आणि वाटण्यात आले होते. आता ‘सिंदूर ऑपरेशन’च्या निमित्ताने ‘सिंदूर रोड शो’सारखे भावनिक कार्यक्रम राबवून मूळ प्रश्नांवरून जनतेचे लक्ष उडविण्याचा प्रकार चालला आहे. पंतप्रधानांनी ‘सिंदूर रोड शो’ व ‘सिंदूर यात्रां’साठी वेळ काढला, पण आतापर्यंत मणिपुरात जाण्यासाठी वेळ काढला नाही, असे का? या प्रश्नाचेही उत्तर मिळाले असून मणिपुरात तेथील अत्याचारग्रस्त, अन्यायग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी नाही, तर मणिपुरात भाजप मुख्यमंत्र्यांच्या शपथग्रहण उत्सवास मोदी उपस्थित राहतील, असे आता स्पष्टपणे दिसत आहे. कुकी आणि मैतेई समाजातील हिंसाचारामुळे मणिपुरात आगडोंब उसळला. सुरक्षा दलांचेही काही चालले नाही. शेकडो महिलांवर
भररस्त्यावर अत्याचार
झाले, महिलांची नग्न धिंड काढली गेली, भररस्त्यावर हत्या झाल्या व मणिपुरातील अनेक महिलांचे सिंदूर पुसले गेले.या हिंसाचारात तेथील भाजप मुख्यमंत्र्यांचाच हात असल्याचे उघड झाल्यावर नाइलाजाने मणिपुरात राष्ट्रपती राजवट लावावी लागली. या सर्व काळात पंतप्रधान मोदी यांनी एकदा तरी मणिपुरात भेट द्यावी व तेथील लोकांची वेदना समजून घ्यावी अशी मागणी होती. मणिपुरात विरोधी पक्षनेते राहुल गांधी गेले, पण पंतप्रधान मोदींनी मणिपुरात जाण्याचे टाळले. मणिपूरच्या हिंसेवर संसदेतही चर्चा घडू दिली नाही. मोदी मणिपुरात पोहोचले नाहीत. पहलगाम हल्ल्यात 26 महिलांचे सिंदूर पुसल्यावर ‘सिंदूर यात्रा’ काढणारे मोदी कश्मीरातही गेले नाहीत, पण ‘सिंदूर’चे राजकारण जोरात करीत आहेत. गेल्या तीन वर्षांत मणिपुरात न जाणारे पंतप्रधान मोदी आज तेथे जाण्याची दाट शक्यता वाटते. कारण मणिपुरात भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. मणिपुरातील भाजप आमदारांच्या गटाने इतर स्थानिक पक्षांना गोळा करून एक कडबोळे तयार केले व राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. मणिपुरात सध्या राष्ट्रपती शासन सुरू आहे. म्हणजे गृहमंत्री अमित शहांचीच राजवट तेथे असल्याने भाजपला सत्तास्थापनेची कोणतीच अडचण येणार नाही. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकारची स्थापना गृहखात्याच्या मदतीने झाली तोच खेळ मणिपुरात यशस्वी व्हायला
कोणतीच अडचण
दिसत नाही. मणिपुरात विधानसभेच्या 60 जागा आहेत. बहुमताचा आकडा 31 चा आहे. 13 फेब्रुवारी 2025 पासून मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू आहे. ही राजवट दूर करून तेथे सरकार स्थापन करायचे व मुख्यमंत्र्यांच्या शपथग्रहण सोहळ्यास (म्हणजे ‘सिंदूर उत्सवा’स) पंतप्रधान मोदींसह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाने उपस्थित राहायचे, असे राजकारण दिल्ली व मणिपूरच्या राजभवनात शिजत आहे. पंतप्रधान मोदी यांनी संकटकाळात मणिपूरच्या जनतेला धीर देण्याचे कर्तव्य पार पाडले नाही. मणिपुरी जनतेला हिंसाचाराच्या वणव्यात ढकलून पंतप्रधान देश-विदेशात फिरत राहिले हे सत्य कोणालाच नाकारता येणार नाही. पंतप्रधानांनी मणिपुरात जायलाच हवे होते. एकतर मणिपुरात भाजपचे शासन व भाजपचाच मुख्यमंत्री होता. दुसरे म्हणजे मणिपूर हे ईशान्येच्या सीमेवरील सतत धगधगणारे राज्य आहे. तेथे फुटीरतावादी गटांचे हिंसक हल्ले सुरूच असतात व तरीही मणिपुरी जनता भारतीय नागरिक म्हणून हातात तिरंगा घेऊन उभी आहे. तेथील जनतेला, महिलांना भररस्त्यावर मारले जात असताना पंतप्रधानांनी त्या राज्याकडे ढुंकूनही पाहू नये हे संतापजनक आहे. आता पंतप्रधान मणिपुरात जातील ते भाजपचे राजकारण यशस्वी करण्यासाठी. हा सर्व प्रकार राजकीयदृष्ट्या घृणास्पद आहे. शेकडो मणिपुरी जनतेच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार धक्कादायक आहे. पंतप्रधान मणिपुरात जाऊ शकतात, पण का, तर एका राजकीय उत्सवात भाग घेण्यासाठी!