समृद्धी मार्ग गुरुवारपासून पूर्ण खुला; मोदींसाठी दोन महिने थांबले, आता मोदींशिवाय लोकार्पण

मुंबई आणि नागपूर शहरांना जोडणाऱया हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा अखेर गुरुवार, 5 जूनला वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. इगतपुरी ते आमणे या 76 किमीच्या टप्प्याचे काम दोन महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. मात्र पंतप्रधानांची वेळ मिळत नसल्याने आता मुख्यमंत्रीच हे लोकार्पण करणार आहेत. लोकार्पण लांबल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वळसा घालत वाहतूक काेंडीचा मनस्ताप सहन करावा लागला.

इगतपुरी ते आमणे या 76 किमीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण 5 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. इगतपुरी येथे हा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. त्याच दिवशी हा अंतिम टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. शेवटच्या टप्प्याचे काम मार्च अखेरीसच पूर्ण झाले होते. त्यानंतर महामार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी वाहनचालकांची अपेक्षा होती. मात्र सरकार पातळीवर दिरंगाई केल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गाने वळसा घालण्याबरोबरच वाहतूक काेंडीचा मनस्ताप दरदिवशी सहन करावा लागत होता. या काेंडीतून आता सुटका होणार आहे.

मुंबईहून नागपूरला 8 तासांत पोचणार

समृद्धी महामार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने मुंबईहून नागपूरला कमी वेळेत पोहोचता येणार आहे. या दोन शहरांतील प्रवासासाठी पूर्वी 16 तास लागायचे. हा प्रवास आता 8 तासांत पूर्ण करता येणार आहे. 701 किमीच्या समृद्धी महामार्गामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पंतप्रधान मोदी मे महिन्यात मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुल येथे वेव्ह्स समिटसाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण करण्याचा महायुती सरकारचा ‘प्लान’ होता. मात्र पंतप्रधान मोदी वांद्रेतील समिटमधूनच दिल्लीला माघारी गेले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते शिर्डीदरम्यान 520 किमी मार्गाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर 23 मे 2023 रोजी शिर्डी ते भरवीर हा 105 किमीचा आणि 4 मार्च 2024 रोजी भरवीर ते इगतपुरी हा मार्ग खुला करण्यात आला. मात्र इगतपुरी ते आमणे हा टप्पा खुला करण्यात दिरंगाई झाली.