महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ‘हायजॅक’, राहुल गांधींच्या लेखामुळे भाजप उघडानागडा पडला! – संजय राऊत

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक भाजपने हायजॅक केली, चोरली, लुटली. राहुल गांधी सातत्याने हे सांगत आहेत आणि आम्हीही बोलतोय. महाराष्ट्रात भाजप आणि त्यांच्या टोळ्यांचा विजय होऊच शकत नव्हता. लोकसभा आम्ही जिंकल्यानंतर 6 महिन्यात असे काय घडले की ज्याच्यामुळे त्यांना एकतर्फी विजय मिळावा? लाडकी बहीण वगैरे यासारख्या आवरणाखाली भाजपने ही निवडणूक हायजॅक केली, असा जोरदार हल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या लेखाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चढवला.

महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत ढळढळीत हेराफेरी केली गेली. ही निवडणूक भाजपने चोरली. ही छोटी-मोठी गडबड नसून, आपल्या राष्ट्रीय संस्थांवर कब्जा करून मोठ्या प्रमाणावर घोटाळे केले जात आहेत, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका लेखाद्वारे केला आहे. यात त्यांनी पाच मुद्दे उपस्थित केले आहे. हिंदुस्थानातील लोकशाही मोदी, शहा, फडणवीस यासारख्या नेत्यांनी कशी हायजॅक केली आहे आणि लोकशाहीची मूल्य कशी पायदशी तुडवली जात आहेत हे मुद्दे आंतरराष्ट्रीय स्तरावरही उपस्थित केले गेले. निवडणूक आयोगापासून अनेक संस्था अस्वस्थ करून सोडल्या आहेत, असेही राऊत म्हणाले.

भाजपचे लोक म्हणताहेत की राहुल गांधी यांची विधाने खोटी आहेत. परंतु, या देशामध्ये खोटे बोलण्याचे नोबेल पुरस्कार जर कुणाला द्यायचा असेल तर तो भाजपचे प्रमुख नेते नरेंद्र मोदी यांना द्यायला पाहिजे. राहुल गांधी ही असामान्य व्यक्ती आहे. राहुल गांधी हे घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते पद हे घटनात्मक पद आहे. त्याच्यामुळे राहुल गांधी यांनी जी विधाने मांडली आहे त्याला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे, असेही राऊत म्हणाले.

राहुल गांधी यांच्या लेखामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या अंगाचा तिळपापड झालेला आहे. देशातील प्रमुख 14 वृत्तपत्रांनी राहुल गांधी यांचे म्हणणे छापल्यामुळे आणि ते लोकांपर्यंत गेल्यामुळे भाजप उघडानागडा पडला. आता फडणवीस यांनी लेख लिहावा, ग्रंथ लिहावा, नवी गीता लिहावी. परंतु भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार महाराष्ट्रात कसे जिंकले हे अख्ख्या जगाला माहिती आहे, असेही राऊत म्हणाले.

भारतीय जनता पक्षाची 25 जागा जिंकण्याची ताकद नव्हती. एकनाथ शिंदे 10-15 जागा जिंकू शकत नव्हते आणि अजित पवारही त्याच रेंजमध्ये होते. निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाला ‘जागावाटप’ केले. त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील मतदान केंद्रावरती सेटिंग केली. राहुल गांधी यांच्या कालच्या लेखामुळे महाराष्ट्रच नाही तर देशात, जगात लोकशाही माणणाऱ्या अनेक देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. देशाच्या जनतेलाही कळले की मोदी आणि कंपनी कशाप्रकारे जिंकतेय, असेही राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातील विधानसभा भाजपने चोरली, राहुल गांधी यांच्या लेखामुळे वादळ

भाजपच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल व्हावा

‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकीय लाभ उठवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लष्करी गणवेशातील फोटो पोस्टरवरून लावून भाजप मते मागत आहे. याचा समाचार खासदार संजय राऊत यांनी ‘पराक्रम नक्की कोणी केला?’ या दैनिक सामनातील रोखठोक सदरातून घेतला. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, भारतीय न्याय संहितेमध्ये जी काही कलमे आहेत, त्यानुसार लष्करी गणवेश वापरला किंवा लष्करासंदर्भातील काही साहित्य, पदके वापरली, फोटो काढून पोस्टरवर लावले तर सामान्य लोकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होऊन साधारण 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते. इथे तर पंतप्रधानांचे गणवेशातील फोटो वापरले असून त्यावर बिहारसह इतर राज्यातील निवडणुका लढल्या जात आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा त्या-त्या राज्यातील प्रदेशाध्यक्षांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. भारतीय जनता पक्ष निवडणूक प्रचारात सैनिकांचा गैरवापर करतो हे स्पष्ट होते, असेही राऊत म्हणाले.

रोखठोक – पराक्रम नक्की कोणी केला?