
आशिया कपमध्ये उद्या 14 सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्याला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. याच विषयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. महाराष्ट्रात नव्हे तर देशात जिथे जिथे शिवसेना आहे त्या प्रत्येक ठिकाणी भारत-पाकिस्तान सामन्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले जाईल आणि ‘माझे कुंकू, माझा देश‘ हे अभियान राबवले जाईल. महाराष्ट्रासह देशातून हजारो महिला पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहलगाममध्ये पुसलेल्या ‘सिंदूर‘ची आठवण करून देण्यासाठी घराघरातून सिंदूर पाठवतील, असेही राऊत शनिवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, भारतात जे प्रखर राष्ट्रभक्त आहेत ते हा सामना पाहणारही नाहीत. ज्यांनी पहलगामचा हल्ला पाहिलाय, अनुभवलाय आणि त्यानंतर जो देश या धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही असे लाखो, कोट्यवधी लोक क्रिकेटप्रेमी असले तरी तो सामना पाहणार नाहीत. कदाचित नरेंद्र मोदी, भाजपचे लोक, त्यांची मुलं, जय शहा, मंत्र्यांची मुलं हा सामना पाहतील. राष्ट्रभक्त हा सामना पाहणार नाहीत. त्यामुळे तिकीटांचा प्रश्नच येत नाही. हा सामना पाहणाऱ्यांचे चेहरे लोकांना दिसले तर ते इथे आल्यावर लोक त्यांना जोडे मारतील, असा इशाराही राऊत यांनी दिला.
सामना अग्रलेख – माझा देश, माझे कुंकू! पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे हा राष्ट्रद्रोहच!
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल तीन वर्षानंतर मणिपूर दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या दौऱ्याकडे कुणाचे लक्ष नाही आणि तो दौरा कुणाच्या खिजगणतीतही नाही. मणिपूरमध्येच याला विरोध होत आहे. त्याच्यामुळे मोदींच्या तीन वर्षानंतरच्या दौऱ्यावर फार न बोलले बरे. देशामध्ये त्यापेक्षा गंभीर प्रश्न आहेत. काही गोष्टींवरती लक्ष जाऊ नये म्हणून मग ते असे उपक्रम साजरे करतात.
उद्या भारत-पाकिस्तान सामना दुबईत खेळला जातोय. देशात त्याला विरोध होत आहे. मग त्यावरचे लक्ष विचलित करायचे म्हणून त्यांची इव्हेंट मॅनेजमेंट टीम असे कार्यक्रम ठरवते. आम्ही त्या दौऱ्याकडे गांभीर्याने पाहत नाही. जेव्हा गरज होती, जेव्हा तिकडे महिलांची नग्न धिंड काढली जात होती, तरुणांना रस्त्यावर आणून मारले जात होते, कारगिल युद्धात भाग घेतलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांच्या पत्नीची विडंबना सुरू होती तेव्हा देशाचे पीएम कुठे होते? तेव्हा त्यांनी तोंड उघडले नाही आणि आता कशाला चालले आहेत? असा सवालही राऊत यांनी केला.