शिवसेनेचा वर्धापन दिन विशेष असेल; मुंबईच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष, संजय राऊत यांचं सूचक विधान

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत आणि तेजस्वी विचारांतून स्थापन झालेल्या शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन 19 जून रोजी साजरा केला जाणार आहे. 19 जूनचा वर्धापन दिन विशेष असेल. महानगरपालिका निवडणुका होत असून राज्यातील सत्तांतरानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. तो यशस्वी व्हावा यासाठी काम सुरू असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तयारी सुरू केली आहे. मुंबईत प्रभाग 227 की 236 हा विषय होता, पण निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले त्यानुसार महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांची तयारी केली आहे. निवडणुका कशा प्रकारे लढायच्या, कुणाबरोबर लढायच्या की स्वतंत्र लढायच्या या संदर्भात चर्चा सुरू आहे. काही विषयांवरील चर्चा संपली असून या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकारी स्थानिक पातळीवर दिलेले आहेत.

आपल्याला महाविकास आघाडीत कुठे कुठे लढता येईल, जर कुठे शक्य नाही तर आपण पूर्णपणे एकटे लढू शकतो का याचा आधी एक आढावा घेण्यास सांगितले असून त्यानंतर पक्षप्रमुख निर्णय घेतील, असे राऊत म्हणाले. तसेच शिवसेना-मनसे युतीबाबत विचारले असता, मुंबईच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून निर्णय होईल, असे ते म्हणाले.

…तर पक्ष, घर फोडले नसते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी सुप्रिया सुळे यांच्याकडे चौकशी केली. याला स्नेह किंवा आदरभाव म्हणत नाही. तो एक शिष्टाचार आहे. शरद पवारांविषयी एवढाच आदरभाव असता तर ज्या पवारांनी मोदींना प्रतिकूल परिस्थितीत मदत केली त्यांचा पक्ष, घर अशा पद्धतीने फोडले नसते. मोदी, शहा जे दाखवतात ते ढोंग असून तो एक पब्लिसिटी स्टंटच आहे. पवारांची तब्येत उत्तम असून मोदी असे दाखवतात की मी चौकशी केली, मी किती भावनाशील माणूस आहे, मला किती आदर आहे. शिवसेनाप्रमुखांचा पक्षही त्यांनी फोडला, पण अधूनमधून भाषणात ते त्यांचे गुणगान करतात आणि मी त्यांचा कसा भक्त आहे हे दाखवतात. ढोंग आणि खोटारडेपणासाठी नोबेल पुरस्कार देण्याची वेळ आली तर तो भाजपच्या अध्यक्षांना आणि मोदींना द्यावा लागेल, तिथे दुसरी स्पर्धाच नाही, असे राऊत म्हणाले.

देशाच्या नजरा पंतप्रधानांच्या निर्णयाकडे

जयंत पाटील हे प्रगल्भ विचार असलेले नेते आहेत. सात वर्षापेक्षा जास्त काळ प्रदेशाध्यक्ष पदावर असल्याने त्यांनी पद सोडायची इच्छा व्यक्त केली असेल तर अशा भूमिकांचे नेहमी स्वागत केले पाहिजे. नवीन नेतृत्व निर्माण व्हावे यासाठी वरिष्ठ नेतृत्व स्वत:हून जागा खाली करत आहे, हे सर्वत्र व्हायला पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांनी ते केले पाहिजे. जयंत पाटलांनी एक आदर्श घालून दिलेला आहे. मोदी आता सप्टेंबर महिन्यात 75 वर्षाचे होतील आणि त्यांच्या पक्षात एक परंपरा आहे की 75 वर्षानंतर सत्तेत रहायचे नाही. त्याच्यामुळे देशाच्या नजरा पंतप्रधानांच्या निर्णयाकडे आहेत, असे फटकारेही राऊत यांनी मारले.