
लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये दिले म्हणजे आम्ही महिलांना सुरक्षित केले, आम्ही त्यांचे हितरक्षक आहोत, असं जर सरकार समजत असेल तर ते सरकार समस्त महाराष्ट्राची फसवणूक करतंय, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप व महायुती सरकारला फटकारले आहे.
”आज जागतिक महिला दिन आहे. आज प्रधानमंत्र्यांनी दिल्लीत महिलांसोबत एक कार्यक्रम ठेवला आहे. आम्ही कसे महिलांचे रक्षक आहोत. महिलांची काळजी घेतो हे दाखवण्यासाठी हे कार्यक्रम घेतले जातात. पण गेल्या काही महिन्यातली महाराष्ट्राची अवस्था पाहिली तर देशातील महिलांवर होणारे अत्याचार महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. मंत्री, सरकारी पक्षातील लोकं त्यात सामिल आहेत. पोलिसांवर दबाव आहे. लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये दिले म्हणजे महिला सुरक्षित आहेत, आम्ही महिलांचे हितरक्षक आहोत असं जर सरकार समजत असेल तर हे सरकार समस्त महराष्ट्राची फसवणूक करत आहे, असे संजय राऊत म्हणाले.
”लाडकी बहिण योजना देखील किती फसवी आहे हे देखील निवडणूकीनंतर समोर आले आहे. निवडणूकीनंतर हे बहिणींना 2100 रुपये देणार होते पण आत संबंधित विभागाच्या मंत्री बाईंनी सांगितले की आता ते शक्य नाही. ही महिलांची फसवणूक आहे. काल मला काही वृद्ध कलाकार भेटले. त्या कलाकारांना सरकारकडून काही मानधन मिळते. ते कलाकार सांगत होते की लाडकी बहिण योजना आल्यापासून आम्हाला मानधन मिळालेले नाही. ही अवस्था आहे या राज्याची. पाहणी अहवाल जो आला ते सांगतंय की हे राज्य कर्जाच्या ओझ्याखाली चिरडतंय. आर्थिक अराजक माजलं आहे. वृद्ध कलाकार आमच्याकडे रडत होते. लाडक्या बहिणींना द्या पण आमच्या सारख्या वृद्ध कलाकारांचे मानधन देत नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या सरकारने 2100 रुपये द्यायचे कबूल केले असतानाही ते द्यायला तयार नाही. या योजनेतून पाच लाख महिलांची नावं कापली गेली मग योजना फसवी नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
”काल एका मंत्र्यांचे प्रकरण समोर आले. एक महिला राजभवनासमोर आक्रोश करतेय. अशा प्रकारात सरकार सक्तीने वागत नसेल तर तुम्ही महिला दिन का साजरा करताय? जो महिलांवर जोरजबरदस्ती करतो, धमक्या देतो त्यांच्यासोबत सक्तीने वागत नसाल काय उपयोग? महिलांना जर तुम्हाला ताकद द्यायची तर त्यांना लाडकी बहिण योजनेतून पैसे देऊन होणार नाही. त्याना त्यांचे हक्क ताकद द्यावे लागणार, असं संजय राऊत म्हणाले.