मराठी अस्मितेसाठी महापालिका निवडणुका ताकदीने लढा, संजय राऊत यांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्धी मुंबई उद्योगपती गौतम अदानीच्या घशात घातली आहे. आता ते ठाणे, पुणे, नाशिक, मालेगाव असे करत अख्खा महाराष्ट्र गिळण्याच्या प्रयत्नात आहेत. मराठी भाषा, मराठी माणूस संपवण्याचे हे षड्यंत्र रोखण्यासाठी मराठी अस्मितेसाठी मुंबई, नाशिक, मालेगावसह सर्वच महानगरपालिका निवडणुका ताकदीने लढा, असे आवाहन शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केले.

मालेगाव येथील साई सेलिब्रेशन लॉन्स येथे आज संजय राऊत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. महायुती सरकारला प्रशासकांच्या माध्यमातून राज्यातील 27 महापालिकांमध्ये भ्रष्टाचार करायचा आहे, म्हणूनच गेल्या तीन वर्षांपासून महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका झालेल्या नाहीत, आता सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्याने निवडणुका घ्यावा लागत आहेत, असा जोरदार हल्ला संजय राऊत यांनी केला.

शिंदे यांना भाजपकडे आश्रीत राहवे लागत आहे!

संजय राऊत यांनी यावेळी प्रसार माध्यमांशीही संवाद साधला. या वेळी त्यांनी सत्तांतर आणि एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे लवकरच कचऱ्याच्या डब्यात जाणार, हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता पाहणार आहे. कामाख्या देवीच्या मंदिरात बळी देऊनही शिंदे यांना भाजपकडे आश्रीत राहवे लागत आहे, असे स्पष्ट करीत खासदार राऊत म्हणाले, भाजपचे नेते एकनाथ शिंदे यांचा कचरा करीत आहेत. येणाऱ्या काळात ते कचऱ्याच्या डब्यात दिसतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता हा अनुभव घेईल. देश कृषी प्रधान आहे. पण या राज्यातील राज्यकर्ते कृषी खाते हे शिक्षेचे खाते आहे, असे समजतात. तेव्हा अशा राज्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांचे काय भले होणार, असेही खासदार राऊत एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.