
आमचं गाव मराठी, आमची भाषा मराठी, आमचा जिल्हा मराठी, आमचं राज्य मराठी… त्यामुळे आमच्या मराठीला पहिलं प्राधान्य देण्यात यावं. तिसरी भाषा असणाऱया हिंदीला पाचवी- सहावीनंतर शिकवण्यात यावं. मुख्यमंत्री कोणत्या भाषेत शिकले आहेत? एका पक्षाने निर्णय घेतला म्हणून महाराष्ट्रात हिंदी सक्ती करू नये, अशा कडक शब्दांत ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी राज्य सरकारला फटकारले. तसेच हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.
हिंदी सक्तीवर परखड भाष्य करताना सयाजी शिंदे म्हणाले, ‘‘घटनेनुसार हिंदी भाषा राष्ट्रभाषा नाही. एखाद्या पक्षाचा तो अजेंडा असू शकतो. घटनेनुसार मुख्य 18 भाषा या राष्ट्रभाषा आहेत. ज्याने त्याने आपल्या राज्यभाषेला आदर द्यायला हवा, पण तो लादायला नको. मुख्यमंत्री नेमके कोणत्या भाषेत शिकलेत हे मला समजत नाही. मराठीतच शिकलेत ना? त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे. तिसरी सक्तीची भाषा नको. आई-बाबांनी आपण शिकलेली मराठी भाषा पहिली मुलांना शिकू द्यावी. त्यानंतर त्यांना कितीही भाषांचं ज्ञान द्यावं.’’
गावागावांत विरोध हवा
‘‘ज्यांनी त्यांनी आपल्या राज्याच्या राज्यभाषेला महत्त्व द्यावं. त्याच्याबद्दल आदर आहे, परंतु तो लादायला नको. पाच-सहा वर्षांच्या मुलाला मराठीची शब्दरचना, वाक्यरचना समजून घेण्याआधीच त्याच्यावर हिंदी लादणं चुकीचं आहे. या गोष्टीला गावा-गावांमध्ये सर्वांनी विरोध करायला हवा. मी 12 भाषेत काम करतो, मात्र लिहून घेताना ते मराठीतच लिहून घेतो. मग ते समजून घेतो. ज्या मातृभाषेत आपण शिकतो, त्याच मातृभाषेने आपण विचार करतो. ही हिंदी भाषा लादून त्याचं भजं करू नका,’’ असे स्पष्ट मत सयाजी शिंदेंनी मांडले.
निर्णय मागे घ्या
‘‘हिंदी भाषा सक्तीचं करण हे पूर्णपणे चुकीचं आहे, असंवेदनशील, अशास्त्राrय आहे. मी आज जो कोणी आहे, तो माझ्या मराठी मातृभाषेमुळे आहे. मी मराठीचा ग्रॅज्युएट असून मराठीतूनच शिक्षण पूर्ण केलंय. मराठीइतकं समृद्ध वाङमय दुसऱया भाषेत नाही. काहीही असो, पण हा निर्णय मागे घ्या. मुख्यमंत्र्यांना आणि भाषा सक्ती करणाऱया कमिटीच्या सदस्यांना ही विनंती आहे की, हिंदीची सक्ती नको. हा निर्णय मागे घ्या,’’ असेही ते म्हणाले.