लोकल मार्गावर दररोज सात जणांचा बळी

लोकल ट्रेनची गर्दी दररोज मुंबईकरांच्या जिवावर बेतत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज किमान 7 प्रवाशांचा अपघाती मृत्यू होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मध्य रेल्वेवर कल्याण, ठाणे तसेच पश्चिम रेल्वेवर वसई व बोरिवली स्थानक परिसरात सर्वाधिक अपघाती मृत्यूची नोंद होत आहे.

2023मध्ये ठाण्यात रेल्वे रूळ ओलांडताना सर्वाधिक 179 प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ बोरिवली स्थानकात 154 प्रवाशांनी रूळ ओलांडताना प्राण गमावला. 2024मध्येही रूळ ओलांडताना ठाणे स्थानक परिसरात सर्वाधिक 151 मृत्यू झाले तर बोरिवली स्थानकात 137 प्रवाशांच्या मृत्यूची नोंद झाली. लोकल ट्रेनमधून पडून होणाऱ्या मृत्यूंमध्ये कल्याण अव्वल स्थानावर आहे. अशा अपघातांत 2023 साली कल्याणमध्ये 114 आणि वसईमध्ये 45 प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ 2024मध्ये कल्याण स्थानकात सर्वाधिक 116 प्रवाशांना प्राण गमवावे लागले, तर वसईमध्ये 45 मृत्यूची नोंद झाली. सद्यस्थितीत पश्चिम रेल्वेवर 1394 लोकल ट्रेनमधून दररोज 35 लाख प्रवाशांची ये-जा सुरू असते. तर मध्य रेल्वेवर दररोज 1810 लोकल ट्रेनमधून 40 लाख प्रवासी प्रवास करतात.