
सरकारचं बैठकांचं गुऱ्हाळ हाच मराठीचा अपमान आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच फडणवीस तुम्ही महाराष्ट्राचे शत्रू असल्यासारखे वागू नका असेही संजय राऊत म्हणाले.
आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, मुंबई, नागपुरातून हिंदी वृत्तपत्र निघतात. नवभारत टाईम्स हे जुनं वृत्तपत्र आहे. इथे हिंदी सक्ती करण्याचं कारण काय? कुणासाठी करत आहात? इथे तुम्ही कुणाचे रेशनिंग कार्ड वाढवत आहेत? आणि ज्या हिंदीसाठी देवेंद्र फडणवीस यांचा आटापिटा सुरू आहे त्या उत्तर प्रदेशात दोन महिन्यांत हिंदी भाषिक पाच हजार शाळा बंद पडल्या आहेत. हजारो शाळांमध्ये हिंदी शिकवायला शिक्षकच नाही. योगींच्या उत्तर प्रदेशात शिक्षकांशिवाय शाळा भरवल्या जात आहेत. हे उत्तर प्रदेशच्या पहिल्या पानावर छापून येत आहे, की हिंदी मातृभाषा असलेल्या लोकांच्या शाळांची अवस्था वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, अमित शहांनी जी त्रिभाषा सुत्री काढली आहे, ती उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्यप्रदेश याला गायपट्टा म्हणतात इथे हिंदी भाषेवर काम करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात हिंदी भाषा संपन्न आहे. आम्हाला शाळेत हिंदी शिकवावी लागली नाही. महाराष्ट्रात, मुंबईत हिंदी शिकवावी लागत नाही. मराठीसोबत हिंदी आहेच. शाळेमध्ये हिंदी शिकवायची आणि सक्ती गरजेची नाही. देवेंद्र फडणवीस हे कुणासाठी सक्ती करत आहेत. त्यांचा उद्देश काय आहे? त्यांना मुंबई महाराष्ट्रात कुणाला वाढवायचं आहे, त्यांनी मराठी माणसांचा, मराठी भाषेचा विचार करावा. मराठी शाळा अभिजात कराव्यात. पण त्यांचा कारभार वेगळ्याच दिशेने सुरु आहे. भाजपचं हेडक्वार्टर असलेल्या गुजरातमध्ये तिथे हिंदी सक्तीची केलेली नाही. एकनाथ शिंदे शिवसेना म्हणून जिथे मांडीला मांडी लावून बसलेले आहेत ना, बाळासाहेबांची आम्हीच खरी शिवसेना म्हणणाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारावा. हिंम्मत दाखवा की गुजरातमध्ये हिंदी सक्तीची का केली नाही? मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृतीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले एक विधान दाखवावं, एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली असेल तर दाखवावं. पण आता हिंदीसाठी बैठका आणि चर्चा सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेचे राजकारण सुरू आहे का? इथल्या हिंदी भाषिकांना चिथवताय तुम्ही. फडणवीस तुम्ही महाराष्ट्राचे शत्रू असल्यासारखे वागू नका असे संजय राऊत म्हणाले.
साहित्यिकांशी चर्चा करण्याचे कारणच का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस याना 10 साहित्यिक माहित आहेत का? एकनाथ शिंदे यांना पाच साहित्यिक माहित आहेत का? साहित्यिकांना मराठी भाशेसंबंधी एवढी चिंता असती तर हिंदी भाषेचा दबाव चालला आहे त्यावर साहित्यिकांनी भूमिका मांडली असती. दक्षिणेत प्रकाश राज यांनी भूमिका मांडली आहे. कुठे आहेत नाना पाटेकर, कुठे आहेत प्रशांत दामले, कुठे आहे माधुरी दिक्षित कुठे आहे आमचे मराठी क्रिकेटपटू? मराठी माणसांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचं, पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्प आहात सगळे. फडणवीसांनी आम्हाला साहित्यिकांशी सांगू नये. त्यातील 90 टक्के पुरस्काराचे लाभार्थी आहेत असे संजय राऊत म्हणाले.
भाजप नेत्यांची मुलं परदेशात शिकत आहे आणि काही परदेशातून शिकून परत आली आहेत. त्यांना ना मराठीचा गंध आहे ना हिंदीचा. मी अभिमानाने सांगू शकलो की माझ्या मुली पालिकेच्या मराठी शाळेत शिकल्या. आणि हट्टाने आम्ही टाकलेली आहेत. साहित्यिकांची मुलं इंग्रजी शिकत आहेत तुम्ही काय त्यांच्या बैठका घेत आहात. सरकारचं बैठकांचं गुऱ्हाळ सुरु आहे या बैठकांची गरजच नाही. हाच मराठीचा अपमान आहे. मराठी भाषेसंदर्भात तुम्ही कुणाची बैठक घेत आहात? मराठीवर आक्रमण करण्यासंदर्भात तुम्ही कोणाची बैठक घेत आहात?
एका देशाचे अभिमान आणि स्वाभिमान काय असतो हे इराणने दाखवून दिले आहे. इराण हे एक असे राष्ट्र आहे जे नेहमी हिंदुस्थानशी भावनिकदृष्ट्या जोडलेले आहे. जेव्हा जेव्हा हिंदुस्थान संकटात आले आहे तेव्हा तेव्हा इराणने साथ दिली आहे. हे आपण विसरता कामा नये. कश्मीरचा प्रश्न असो किंवा पाकिस्तानचा, इराण नेहमी आपल्या पाठीशी उभा राहिला आहे. इराणने जे केले आहे त्यातून आपल्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी काहीतरी शिकले पाहिजे. एक देश जो क्षेत्रफळाने आपल्यापेक्षा छोटा आहे पण अमेरिकेला, इस्रायलला, युरोपियन राष्ट्रांना नाही घाबरला. आणि आपल्या स्वाभिमानासाठी लढत राहिला. जेव्हा पाकिस्तानसोबत आमचे सैन्य लढत होतं आणि आपण जिंकण्याच्या मार्गावर होतो. कराची, इस्लामाबाद, लाहोर आपण जिंकणार होतो मग मागे का हटलो?
ट्रम्प यांनी सांगितले की शस्त्रसंधी झाली आणि इराणने नकार दिला. ही खूप मोठी बाब आहे. आपल्याला ट्रम्पने असे सांगतले तेव्हा आपण गप्प बसलो. पण इराण गप्प नाही बसला. हीच एका राष्ट्राची आत्मा असते जी जागते आणि आमच्या देशावर हल्ला झाला तर आम्ही गप्प नाही बसणार हे जगाला दाखवलं.
अजित पवार जिंकले याला काय फार मोठी गोष्ट नाही. सत्ता आहे पैसा आहे रात्रभर बँका उघड्या ठेवल्या. राज्याचे अर्थमंत्री 15 दिवस महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून बारामतीत बसले. धाक दहशत पैसा याचा वापर केला. राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री असलेले गृहस्थ पंधरा दिवस गावात जाऊन बसता यातचं सगळं काही आलं ना. इथे शेतकऱ्यांच्या तोंडावर मारायला पैसा नाही आणि कारखान्यासाठी 500 कोटी रुपये घेऊन असे म्हणतात. अशा प्रकारची लोक या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. 500 कोटी रुपये तुम्ही कुठून आणणार आहात? आपल्या खिशातून आणणरा आहात का ? की नरेंद्र मोदींच्या खिशातल्या घेऊन येणार तेवढं कळवा असेही संजय राऊत म्हणाले.