नदीकिनारी बनवलेली रील अखेरची ठरली, मग अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या अन् 6 जणी बुडाल्या

अंघोळीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील सहा मुली यमुना नदीत बुडाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यापैकी चौघींचा मृत्यू झाला तर दोघींची प्रकृती गंभीर आहे. वाचवण्यात आलेल्या दोन मुलींवर एसएन मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील स्वामी नगला गावाजवळ ही घटना घडली.

उकाड्याने हैराण झाल्याने सर्व मुली यमुना नदीवर अंघोळीसाठी गेल्या होत्या. अंघोळीला जाण्यापूर्वी सर्व मुलींनी नदीकिनारी रील बनवली. यानंतर सर्वजणी पाण्यात उतरल्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडू लागल्या.

ही घटना लक्षात येताच स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. मात्र पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्य राबवेपर्यंत चौघींचा मृत्यू झाला होता. दोघींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मुलींच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.