
जोगेश्वरी आणि राम मंदिर स्थानकांच्या दरम्यान असलेली एक पडीक जागेचा चेहरा मोहरा बदलणार आहे. या भागात कचरा, रेल्वेचे भंगार पडलेलं असंत. त्या जागी रेल्वेचे चकाचक वंदे भारत ट्रेनचा मुक्काम होणार आहे. पश्चिम रेल्वे या जागेचे रुपांतर वंदे भारत आणि वंदे भारत स्लीपर गाड्यांसाठी डेपोमध्ये करणार आहे.
हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिला असून पश्चिम रेल्वेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे प्राथमिक काम लवकरच सुरू होणार आहे. सुरूवातीला इथे 5 ते 10 गाड्यांसाठी सुविधा असेल आणि नंतर 50 फास्ट गाड्यांची देखभाल आणि थांबा इथे देण्यात येईल. वंदे भारत मालिकेतील गाड्या 160 किमी प्रतितास वेगाने धावण्यासाठी तयार करण्यात आल्या असून, रेल्वेच्या आधुनिकिकरण मोहिमेचा ते भाग आहेत.
पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांनी सांगितले, की या डेपोसाठी जोगेश्वरी आणि राम मंदिर स्थानकांदरम्यान सुमारे 6 एकरची जागा निवडली आहे. ही जागा केवळ वंदे गाड्यांसाठी खास तयार केली जाणार आहे. पश्चिम रेल्वेचं जाळं आता 160 किमी प्रतितास वेगासाठी तयार होतंय, आणि जोगेश्वरी टर्मिनसचं कामही चांगल्या गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वे मंत्रालयाने पश्चिम व मध्य रेल्वेला अशा खास वंदे भारत डेपोच्या जागा निवडण्याच्या सूचना केल्या होत्या. मध्य रेल्वेने सीएसएमटीजवळ वाडी बंदर जागा निवडली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी चांगली जागा असल्याने पश्चिम रेल्वेने वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या जवळची जागा निवडली आहे. जोगेश्वरी आणि राम मंदिर दरम्यानची जागा पूर्णपणे दुर्लक्षित आहे. इथे मोडकळीस आलेले रेल्वेचे डबे, कचरा, गवत आहे. ही जागा स्वच्छ केल्यानंतर तिथे पूर्ण डेपो आणि देखभाल केंद्र तयार होऊ शकते. यापूर्वी पश्चिम रेल्वेने साबरमती आणि इंदूर येथे अशाच डेपोच्या जागा ठरवल्या आहेत.
हा डेपो नव्या जोगेश्वरी टर्मिनसच्या अगदी जवळ असणार असून नवीन जोगेश्वरी टर्मिनस या वर्षाच्या शेवटीपर्यंत सुरू होणार आहे. गेल्या तीन दशकांतील मुंबईतला पहिला नवीन रेल्वे टर्मिनस असेल (एलटीटीनंतर). 77 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या टर्मिनसला तीन प्लॅटफॉर्म असतील. या टर्मिनसजवळ रिक्षा आणि टॅक्सीसाठी पार्किंगची सुविधा असेल. यामुळे दादर, वांद्रे आणि मुंबई सेंट्रलसारखे टर्मिनसवरची गर्दी कमी होण्यास मदत होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या डेपोमुळे जोगेश्वरीहून वंदे भारत गाड्या सुरू होण्याची शक्यता वाढणार आहे.