मायनिंग लॉबीला राजकीय पक्ष, अधिकाऱ्यांचे अभय; स्टॅलिन दयानंद यांचा आरोप

सिंधुदुर्गाचा विकास होऊन रोजगार मिळेल असे भासवून सिंधुदुर्गातील जमिनीत असलेल्या खजिनांचे उत्खनन मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. मायनिंग लॉबीला राजकीय पक्षांसह सत्ताधारी मंडळी आणि अधिकाऱ्यांचे अभय असल्याचा आरोप वन्यशक्ती संस्थेचे स्टॅलिन दयानंद यांनी केला आहे. मायनिंग लॉबी मायनिंगमुळे कासार्डेतील अवैध सिलिका उत्खननाचा अभ्यास करून कोर्टात दाद मागणार असून मायनिंगविरोधात आमचा लढा सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले.

कणकवली येथील विजयभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार वैभव नाईक उपस्थित होते. स्टॅलिन दयानंद म्हणाले, कासार्डे परिसराची मी पाहणी केली. त्यावेळी अवैध व चुकीच्या पद्धतीने सिलिका उत्खनन व वाहतूक राजरोसपणे दिसून आले. या भागाची अवस्था गाझापट्टीसारखी झाली आहे. सिलिका उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, जलप्रदूषण वाढ होणार आहे. त्याचा फटका कासार्डे व आजूबाजूच्या गावांना बसणार आहे. उत्खननामुळे पर्यावरणाच्या ऱ्हास, जलप्रदूषण वाढणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी वेळीच सावध होऊन अवैध सिलिका उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी लढा दिला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

कुपवडे, सासोलीसह अन्य भागात क्रशर सुरू आहेत. क्रशरद्वारे काळीतर दगड काढले जात आहे. या दगडाची वाहतूक राज्यात व राज्याबाहेर होत आहे. मायनिंग लॉबी पर्यावरणाचा हानी करून स्वतःची तुमडी भरत आहेत. मायनिंगमुक्त सिंधुदुर्ग जिल्हा करणे आमचे ध्येय असल्याचे स्टॅलिन दयानंद यांनी सांगितले.

पर्यावरणासह जलप्रदूषणात वाढ

मायनिंगमुळे पर्यावरणासह जलप्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतजमिनी नापीक बनत चालल्या आहेत. कासार्डेत सुरू असलेल्या अवैध सिलिका उत्खनन आणि सिलिका वॉशिंग प्लांटमुळे जलस्रोत दूषित होत आहेत. यापुढील काळात सिलिकाचे उत्खनन व वॉशिंग प्लांट सुरू राहिल्यास या परिसरात लगतच्या गावांमधील जमिनी नापीक होऊन पिण्याचा पाण्याचा गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.