
राजापूर तालुक्यातील मीठगवाणे येथील सागरी महामार्गावर बुधवारी सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून सात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
वाघ्रण येथून बागकामासाठी जानशी पठाराकडे निघालेल्या महिलांचा टेम्पो समोरून जात असलेल्या लक्झरी बसला ओव्हरटेक करत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे वाहन उलटले आणि सुमारे 100 ते 150 फूट फरफटत गेले. या अपघातात टेम्पोतील सर्व महिला व एक छोटी मुलगी गंभीर जखमी झाली. तसेच टेम्पोचालक आणि केबिनमधील इतर पुरुष प्रवासीही जखमी झाले.
सर्व जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सागरी पोलीस ठाण्याचे पथक, पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आणि स्थानिकांनी मिळून बचावकार्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास सागरी पोलीस करत आहेत.