ठाण्यातील हजारो कोटींच्या जमीन घोटाळ्यावर कारवाईत टाळाटाळ, फडणवीसांचे आदेश पोलिसांकडून पायदळी; अंबादास दानवे यांचा आरोप

ठाणे येथील एका ट्रस्टची सुमारे दीड हजार कोटी रुपये किमतीची 65 एकर जमीन एका खासगी संस्थेला कवडीमोल दरात हस्तांतरीत करण्यात आली. त्याप्रकरणी चौकशीचे आदेश फडणवीस यांनी दिले होते; परंतु पोलिसांकडून कारवाईत जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला असून मुख्यमंत्र्यांनी याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील रतनशी प्रेमजी चॅरिटेबल ट्रस्टची ही जमीन वडवली व ओवळे या भागात आहे. बिल्डरांना फायदा पोहोचवण्यासाठी ठाणे महानगरपालिका, महसूल विभागातील अधिकारी आणि ट्रस्टच्या विश्वस्तांनी संगनमत करून ती जमीन फेनकिन इन्फोटेक एलएलपी या खासगी संस्थेला अवघ्या 70 कोटी रुपयांमध्ये हस्तांतरीत केली. उच्च न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेत याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश 7 मार्च रोजी दिले होते. धर्मादाय आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयावर याप्रकरणी चौकशी केली जाईल, अशी घोषणा विधिमंडळात केली होती आणि तसे लेखी निर्देशही दिले होते.

खोटी कागदपत्रे आणि बिल्डर्सचा सहभाग

महसूल विभागातील तहसीलदार व तलाठी यांनी नोंदणीपृत दस्तावेज प्रलंबित असतानाही ट्रस्टच्या सातबारा उताऱ्यावर फेनकिन इन्पह्टेक एलएलपी संस्थेच्या नावे नोंद केली. हे सगळे प्रकरण हे अतिशय पद्धतशीरपणे बनावट कागदपत्रे तयार करून जमीन विकण्यासाठी करण्यात आले आहे. बँक खात्यात दीडशे रुपयेही नसलेल्या केसरियाजी पॅपिटल नावाच्या नॉन बँकिंग एनडीएफसीकडून 120 कोटी रुपयांचे हमीपत्र घेऊन ते धर्मादाय आयुक्तांकडे सादर करण्यात आले. ठाण्यातील अनेक मोठे बिल्डर्स यात गुंतलेले आहेत, असे नमूद करून सदर ट्रस्ट बरखास्त करावी आणि त्यावर प्रशासक नेमावा, अशीही मागणी दानवे यांनी केली आहे.