
भुयारी मेट्रोच्या गिरगाव स्थानकाजवळ रस्ता खचल्यापासून स्थानिक रहिवासी जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत. मेट्रो स्थानकाच्या कामामुळे आसपासच्या जुन्या इमारतींना तडे गेले आहेत. स्थानकाचे काम करताना ठिकठिकाणी बांधकाम साहित्याचे ढिगारे पडलेले आहेत. पावसात या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने रहिवाशांमध्ये रोगराई पसरली आहे. अनेकांना मलेरिया, चिकनगुनिया, डेंग्यूचा त्रास झाला असून यात कुणाचा बळी गेला तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल गिरगावच्या मराठी कुटुंबांकडून केला जात आहे.
आरे ते कुलाबा मेट्रो-3 मार्गिकेवर वरळीच्या आचार्य अत्रे चौक स्थानकांपुढील मेट्रो स्थानकांचे काम अजून सुरू आहे. 2019 मध्ये बांधकाम चालू करण्यात आले होते. मात्र मागील दोन-तीन वर्षांत बांधकामाचा वेग मंदावला. गिरगाव स्थानकाचे काम करण्यासाठी तेथील आठ ते नऊ इमारती रिकाम्या करण्यात आल्या. मेट्रो प्रशासन त्या इमारतींतील रहिवाशांचे पुनर्वसन करणार आहे. मात्र प्रत्यक्ष खोदकाम सुरू केल्यानंतर शेजारील क्रांतीनगरमधील आठ इमारतींनाही मोठे तडे गेले. त्यावेळी मेट्रो प्रशासनाने इमारतींना लोखंडी खांबांचा टेकू दिला आहे.
गणेशोत्सव मंडळांनाही मिरवणुकीबाबत चिंता
काही महिन्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. भुयारी मेट्रोचे बांधकाम सुरू असलेल्या ठाकूरद्वार मार्गावरून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मोठे गणपती विसर्जनासाठी चौपाटीला जातात. काही दिवसांपूर्वी ठाकूरद्वार जंक्शनजवळ मेट्रोच्या निकृष्ट कामामुळे रस्ता खचला. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरून गणपतीची विसर्जन मिरवणूक काढणे सुरक्षित आहे का, अशी चिंता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही सतावू लागली आहे.
क्रांतीनगरच्या आठ बिल्डिंगमध्ये जवळपास 300 कुटुंबे आहेत. प्रत्येक बिल्डिंगमध्ये मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण आहेत. मेट्रोच्या बेफिकीर कामामुळे गटाराचे पाणी वस्तीत शिरत आहे. रस्त्यावर उघडय़ावर बांधकाम साहित्यामुळे अपघात होत आहेत. – बाळकृष्ण बाणे, रहिवासी
मेट्रोचे कामगार उघडय़ावरच शौचास बसतात. तसेच इतर घाणीमुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मी 15 दिवसांपासून चिकनगुनियाने त्रस्त आहे. विकास सर्वांनाच हवा आहे. मात्र लोकांच्या जीवनाशी खेळ करून विकास नको. – शैलेश म्हस्के, रहिवासी
आमची बिल्डिंग दीडशे वर्षांपूर्वीची आहे. मेट्रोच्या कामामुळे घराच्या भिंतीला मोठे तडे गेले. आम्ही असुरक्षित जीवन जगत आहोत. तडे गेल्यानंतर मेट्रो प्रशासनाने कोणतीही भरपाई दिली नाही. फक्त बिल्डिंगना टेकू लावण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडली. – मीना कुवेसकर, रहिवासी
मेट्रोचे काम सहा वर्षांपासून सुरू आहे. या ठिकाणी प्रत्येक पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचते. त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासन पुरेशी काळजी घेत नाही. त्यामुळे परिसरात रोगराई पसरत आहे. मला आणि माझ्या आईला दोनदा मलेरिया झाला आहे. – यतीन रेगे, रहिवासी