
99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ 8 जूनला ठरणार आहे. संमेलनासाठी सदानंद साहित्य मंडळ-औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद- शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा-कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी, सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली आहेत.
साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी स्थळ निवड समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती 5 ते 7 जूनदरम्यान निमंत्रक संस्थांना भेट देत आहे, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. या स्थळांना भेटी दिल्यानंतर स्थळ निवड समितीची बैठक रविवारी पुण्यात होणार आहे. त्याच दिवशी साहित्य महामंडळाची बैठक होणार असून त्यात साहित्य संमेलनाच्या स्थळावरती शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. संमेलनासाठीची जागा, सोयीसुविधा, ग्रंथप्रदर्शन आणि लोकांची उत्सुकता आदी बाबींचा विचार करून संमेलन स्थळ निश्चित करण्यात येईल, असे प्रा. जोशी म्हणाले.
स्थळ निवड समितीत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, मराठवाडा साहित्य परिषदेचे रामचंद्र काळुंखे, मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रतिभा सराफ यांचा समावेश आहे.