
शेतात काम करत असताना विजेचा धक्का लागून शेतकऱयासह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जालना जिल्हय़ातील वरुड येथे सकाळी 11 वाजता ही घटना घडली. विजेचा धक्का लागल्यानंतर तिघांनाही जालना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिघांना तपासून मृत घोषित केले. विनोद तुकाराम म्हस्के (32) यांचे वरुड शिवारात शेत आहे. शेतात मल्चिंग पेपर अंथरत असतानाच त्यांना विजेचा जोरदार धक्का बसून ते कोसळले. हे पाहून बाजूला खेळणारी श्रद्धा (10) आणि समर्थ (7) हे दोघे त्यांना उठवण्यासाठी गेले. परंतु विनोद मस्के यांच्या अंगात विद्युत प्रवाह असल्याने या दोन चिमुकल्यांनाही विजेचा धक्का बसला.