
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्र सरकारच्या अपयशावरून जनतेचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तसेच पश्चिम बंगालला कथित पाच संकटांबद्दल सतर्क करण्याबद्दल मोदींनी केलेल्या टिपण्णीप्रकरणी मोदींना उलट पाच प्रश्न विचारले आहेत. पहिलाच प्रश्न मणिपूरबद्दल करून मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोंडीत पकडले आहे.
- मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखून दाखवा, असे आव्हान तृणमूल काँग्रेसने मोदींना दिले आहे. येथे गेल्या दोन वर्षांपासून कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार चिंधड्या उडाल्या असून परिस्थिती अतिशय गंभीर आहे याकडे तृणमूलने लक्ष वेधले आहे.
- महिला सुरक्षा? उन्नावच्या हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी भाजपने मौन धरण्याचे रेकॉर्ड केले असून हे अत्यंत लज्जास्पद आहे.
- तरुणांमध्ये निराशेचे वातावरण? पेपर लीक, नीट घोटाळा आणि 45 टक्के बेरोजगारी अशी राष्ट्रीय भेट भाजपने तरुणांना दिली आहे.
- भ्रष्टाचार? भाजपचे अर्धे मंत्रिमंडळ जामिनावर. बाहेर असल्याचे दाखवत भाजपच्या कार्यकाळात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही तृणमूलने केला आहे.
- योजनांच्या निधीपासून बंगाल वंचित? मोदी सरकारच्या सुडाच्या राजकारणामुळेच पश्चिम बंगालला मनरेगा आणि पंतप्रधान आवास योजनांसाठीच्या निधीपासून वंचित राहावे लागल्याचेही तृणमूलने म्हटले आहे.
काय म्हणाले मोदी?
पश्चिम बंगालला चांगले सरकार हवे. निर्मम म्हणजेच क्रूर सरकार नको, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगाल दौऱ्यातील सभेत केलेल्या भाषणात म्हटले. पश्चिम बंगालवर पाच संकटे आल्याचा इशारा मोदींनी दिला. हिंसाचार आणि अराजकता हे पहिले संकट आहे. माता आणि भगिनींमध्ये असुरक्षिततेची भावना हे दुसरे संकट. तर तिसरे संकट बेरोजगारी आणि नोकऱ्या घटल्यामुळे तरुणांमध्ये वाढलेली निराशा. प्रचंड भ्रष्टाचारामुळे जनतेचा सरकारवरील उडत चाललेला विश्वास हे चौथे संकट असून सत्ताधारी पक्षाचे स्वार्थी राजकारण आणि गरीबांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवणे तसेच मुर्शिदाबाद आणि मालदासारख्या घटनांवरून सरकारची क्रूरता आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेले सरकार हे पाचवे संकट असल्याचे मोदी म्हणाले.