अतिवृष्टीसाठी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही, मंत्र्यांनी दाखवला आरसा; वडेट्टीवार यांचा महायुतीवर निशाणा

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली म्हणून पाठ थोपटून घेतलेल्या महायुती सरकारला त्यांच्याच मंत्र्यांनी आरसा दाखवला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत आणि पुनर्वसन मंत्री यांनीच शेतकऱ्यांना मदत पोहचली नसल्याचे सांगितले. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. शेतकऱ्यांच्या मदतीवरून मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये यावरून वाद झाल्याचे वृत्त आहे. शेतकऱ्यांना मदत पोहोचली नाही हे आम्ही दिवाळीत सांगत होतो. शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली, राज्यातील बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे. पण महायुती सरकारमध्ये निवडणुका, एकमेकांचे पाय ओढणे यापलिकडे कोणाला काही पडलेलं नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

सरकार आणि प्रशासन शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही म्हणून एकमेकांकडे बोट दाखवत आहे, अशी जबाबदारी झटकून उपयोग नाही. राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीला हे सरकार जबाबदार आहे, त्यांना लवकरात लवकर मदत करा, त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असेही विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला सुनावले.