
आयपीएल 2025चे विजेतेपद पटकावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) आनंद चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे काही क्षणातच मावळला होता. पहिल्यांदाच ट्रॉफी उंचावल्याने बंगळुरूतील चिन्नस्वामी स्टेडियम आणि परिसरात आरसीबीच्या चाहत्यांची अलोट गर्दी उसळली होती. या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला होता. तर अनेक जण जखमी झाले. या घटनेवर आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने अखेर मौन सोडले असून आनंदाचा क्षण काही क्षणातच दुःखात बदलला असल्याची भावनिक प्रतिक्रिया त्याने दिली.
विराटची भावनिक प्रतिक्रिया आरसीबीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली. जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहताना विराटने आगामी काळात फ्रेंचायझी अधिक सावधगिरीने आणि जबाबदारीने पाऊल टाकेल, असे आश्वासन दिले. किंग कोहलीचे हे विधान ‘आरसीबी केअर्स’ उपक्रमाचा भाग आहे, ज्याअंतर्गत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भविष्यात उपाययोजना केल्या जाणार आहेत.
4 जून रोजी हृदयद्रावक घटना घडली, त्यासाठी जीवनात तुम्हाला कधीच तयार केले जात नाही. आमच्या फ्रेंचायझीच्या इतिहासातील सर्वात आनंदाचा क्षण असायला हवा होता, पण तो एका दुःखद क्षणात बदलला. ज्या कुटुंबांनी त्यांचे प्रियजन गमावले त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. तुमचे झालेले नुकसान आमच्या कथेचा भाग आहे. त्यामुळे आता आपण सर्व जण सावधानता, आदर आणि जबाबदारीने पुढे जाऊया.
विराट कोहली



























































