
देशातील दोन राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. आसाम, केरळ आणि पुडुचेरीमधील एकूण २९६ जागांवर आज एकाच टप्प्यात मतदान पार पडणार असून, सुमारे ६ कोटी मतदार १८९९ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. या निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहे.
आसाम (१२६ जागा)
आसाममध्ये गेल्या १० वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यंदा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि काँग्रेसचे गौरव गोगोई यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. आसाममध्ये एकूण २.५० कोटी मतदार असून बहुमतासाठी ६४ जागांची आवश्यकता आहे. येथील जलुकबारी, जोरहाट आणि गुवाहाटी सेंट्रल यांसारख्या जागांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केरळ (१४० जागा)
केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ (LDF), विरोधी पक्ष यूडीएफ (UDF) आणि भाजप (NDA) यांच्यात तिरंगी लढत आहे. राज्यातील २.७१ कोटी मतदार ८८३ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. येथे बहुमताचा आकडा ७१ आहे.
पुडुचेरी (३० जागा)
पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशात ९.४४ लाख मतदार असून २९४ उमेदवार रिंगणात आहेत. येथे एनडीए (NDA) आणि यूपीए (UPA) यांच्यात चुरशीची लढत असून बहुमतासाठी १६ जागांची गरज आहे.



























































