पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी पूर्ण करेल, नितीन गडकरी यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होणे अपेक्षित होते. मात्र मागील आठ-दहा महिन्यांपासून ही प्रक्रिया रखडली आहे. यातच नवीन पक्षाध्यक्षासाठी पक्षांतर्गत चाचपणी सुरू आहे. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, “कार्यकर्त्याकडे कोणती जबाबदारी असेल आणि तो कोणते काम करेल, हे पक्ष ठरवतो. मला जी काही जबाबदारी दिली जाईल ती मी पूर्ण करेन.” त्यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. एका मुलाखतीत ते असं म्हणाल्याचे वृत्त ‘एबीपी न्यूज’ने दिलं आहे.

विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काम करण्याची वैयक्तिक इच्छा असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले आहेत नितीन गडकरी म्हणाले, “आजकाल मी रस्ते बांधणीपेक्षा शेती आणि इतर सामाजिक उपक्रमांवर जास्त काम करतोय.”

हिंदुस्थान दरडोई उत्पन्नात जगातील पहिल्या 10 देशांमध्ये का नाही, असे विचारले असता, नितीन गडकरी म्हणाले की, “यासाठी देशाची लोकसंख्या जबाबदार आहे.” लोकसंख्या नियंत्रण विधेयकाचे समर्थन करताना ते म्हणाले, “हा धार्मिक किंवा भाषिक मुद्दा नाही. हा आर्थिक मुद्दा आहे. इतका विकास होऊनही त्याचे परिणाम दिसत नाहीत. याचे कारण वाढती लोकसंख्या आहे.”