हिंदी सक्तीला विरोध तीव्र, पुरस्कार परतीचे अस्त्र उगारले! कवी हेमंत दिवटे यांचा मराठी बाणा; माझ्यावर बंदी घातली तरी मागे हटणार नाही

पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होतोय. लेखक, कलावंत, शिक्षण तज्ञ, मराठी भाषाप्रेमी निषेध व्यक्त करत आहेत. साहित्यिक लेखणी सरसावून सरकारच्या या मराठीद्रोही भूमिकेचा धिक्कार करत आहेत. आता साहित्य क्षेत्रातून पुरस्कार परत करत निषेधाचे अस्त्र्ा उगारण्यात आले आहे. कवी हेमंत दिवटे यांनी पहिली ठिणगी टाकत हिंदी सक्तीच्या विरोधात राज्य सरकारने दिलेला पुरस्कार परत करत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या निर्णयाचे मराठी भाषाप्रेमींकडून स्वागत करण्यात येत असून समर्थनाच्या अनेक पोस्ट पडत आहेत.

कवी हेमंत दिवटे यांनी आपण सरकारला पुरस्कार परत करणार असल्याची माहिती सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून दिली. सध्या हिंदीवरून सुरू असलेल्या अस्वस्थतेतून हा निर्णय घेतल्याचे कवी हेमंत दिवटे म्हणाले. मागील काही दिवसांत मी काही कविताही केल्या होत्या. या निर्णयामुळे माझ्यावर बंदी येईल, अशी भीती असली तरी मी निर्णय घेतला आहे, असे कवी दिवटे म्हणाले. येणाऱdया पिढीसाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

  • सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून मला ‘पॅरानोया’ या कवितासंग्रहासाठी मिळालेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार रकमेसकट परत करीत आहे. सरकारने निर्णय मागे घेतला तरच मी माझा निर्णय मागे घेईन. सध्या हिंदीवरून सुरू असलेल्या अस्वस्थतेतून हा निर्णय घेतल्याचे कवी हेमंत दिवटे म्हणाले.

हा राजकीय नाही… सामाजिक प्रश्न

मुलांना पाचवीनंतर शिकवा की हिंदी. आमचा विरोध प्राथमिक शिक्षणात समावेशाला आहे. सरसकट हिंदी भाषेला नाही. उगाच या धोरणाला विरोध म्हणजे हिंदीला विरोध असा बालिश तर्क काढून याला राजकीय स्वरूप देऊ नका. हा सामाजिक प्रश्न आहे राजकीय नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया लेखक- दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी दिली.

हिंदीच्या अट्टहासापायी विद्यार्थ्यांचे नुकसान का करताय?

हिंदीच्या अट्टहासापायी विद्यार्थ्यांचे नुकसान का करताय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला केला आहे. महाराष्ट्र शासनाने पहिलीपासून हिंदी भाषा शिकविण्याचा निर्णय घेत मागच्या दाराने शिक्षणात त्रिभाषा सूत्र घुसडले आहे. त्रिभाषा सूत्राबाबतचा हट्ट पुरविण्यासाठी कार्यानुभव, खेळ आणि कला या विषयांसाठीचे तास कमी करण्यात आले आहेत ही सर्वात काळजीची बाब आहे, असे त्या म्हणाल्या.