
वरळीतील शिक्षणप्रेमी मंडळ संचालित उत्कर्ष नाईट हायस्कूल या रात्रशाळेचा दहावीचा निकाल 90 टक्के लागला आहे. या रात्रशाळेतील विद्यार्थी हे दिवसा काम व कमाई करून कौटुंबिक जबाबदारी सांभाळून शिक्षण घेत असतात. नोकरी आणि शिक्षण घेत या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
वरळी बीडीडी चाळीत राहणाऱ्या आणि शाळा सोडून 20 वर्षे झालेल्या अर्चना सुर्वे हिने 60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर खासगी कंपनीत काम करत व अडचणीचा विचार न करता रेश्मा पाखरे हिने 58.80 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. घाटकोपर ते वरळी प्रवास करीत वर्षा कचरे हिने 57.80 टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. दिव्यांग विद्यार्थिनी रूपाली समगीसकर 50.40 टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाली आहे. या यशामध्ये मासूम या सामाजिक संस्थेच्या संचालिका निकिता केतकर यांनी मोलाचे योगदान दिले. उतीर्ण सर्वांचे मंडळाचे सचिव एम.वाय. पवार, अध्यक्ष काब्रा, खजिनदार मीनल वगळ, मुख्याध्यापक शिवदास जाधव, शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.