माझ्याविषयी आक्षेपार्ह बोलून देशाचा फायदा होणार का? केजरीवाल यांनी भाजपला फटकारलं

आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी 2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी सोमवारी पुजारी आणि गुरुद्वारातील ग्रंथी सन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत दिल्लीतील सर्व पुजारी आणि ग्रंथींना दरमहा 18 हजार रुपये दिले जातील. मात्र, या घोषणेवरून भाजपवाले प्रचंड संतापले ते थेट अरविंद केजरीवाल यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत बोलत आहेत. त्यावरून अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझ्याविषयी आक्षेपार्ह बोलून देशाचा फायदा होणार आहे का? असा सवाल करत केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला.

अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पुजारी आणि गुरुद्वारातील ग्रंथी सन्मान योजनेची घोषणा केली आहे. त्यानंतर  भाजपकडून त्यांना ट्रोल करण्यात आले. आता त्यावरून अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, माझ्याविषयी आक्षेपार्ह बोलून देशाचा फायदा होणार आहे का? तुमचे 20 राज्यांमध्ये सरकार आहे. गुजरातमध्ये तर तुमचे 30 वर्षांपासून सरकार आहे. आतापर्यंत तुम्ही तिथल्या पुजारी आणि ग्रंथीचा सन्मान का केला नाही? मग आता करा? मी आता सर्वांना रस्ता दाखवला आहे. माझ्याविषयी आक्षेपार्ह बोलण्यापेक्षा ती 20 राज्यामध्ये लागू करा ना, तेव्हा तर सर्वांना फायदा होईल. माझ्याविषयी आक्षेपार्ह का बोलतात? असा संतप्त सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला.