संगमनेरमध्ये गोवंश जनावरांसह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त, घारगाव पोलिसांची कारवाई; 10 जणांवर गुन्हा दाखल

बेकायदेशीर कत्तलखाने आणि गोवंशहत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या संगमनेरमध्ये सातत्याने गोवंशहत्या होत असल्याचे उघड होत आहे. यासंदर्भात घारगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, 17 गोवंश जनावरांची सुटका करत 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 16 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या खालची माहुली या नावाच्या शिवारात पुणे-नाशिक महामार्गावर साईबाबा मंदिरसमोर सहा वाहनांमध्ये गायी, वासरे चारा-पाण्याविना दाटीवाटीने बांधून भरून घेऊन जात असल्याचे आढळून आले.

बजरंग दलाचे कार्यकर्ते रोशन रमेश कवडे (रा. जवळेबाळेश्वर, ता. संगमनेर), ऋषिकेश सखाराम भोर आणि दादाभाऊ अण्णा खरात यांनी या गाड्या अडविल्या आणि संबंधितांवर घारगाव पोलिसांनी कारवाई करण्यासाठी माहिती देण्यात आली. माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 17 गोवंश जनावरांची सुटका करीत मुद्देमाल ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. जनावरांनी भरलेल्या सहा पिकअप व इतर गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या.

फारूख युसूफ सय्यद (रा. अलकानगर, संगमनेर), शहाबाज अझिझ शेख (रा. कुरण रोड, संगमनेर), शब्बीर शेख (रा. संगमनेर खुर्द, संगमनेर), संतोष सखाराम भिसे (रा. डिग्रज, तालुका संगमनेर), मोबीन शेखलाल शेख (रा. मदिनानगर, संगमनेर), साद शफिक शेख (रा. संगमनेर खुर्द, संगमनेर), अझिझ छोटू शेख (रा. संगमनेर खुर्द, संगमनेर), अजय सुरेश शिंदे (रा. हिवरे तर्फे, नारायणगाव), अजहर मोईन शेख (रा. संगमनेर खुर्द, संगमनेर), माणिक बाळू मोरे (रा. डिग्रस, ता. संगमनेर) अशा 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास घारगाव पोलीस करीत आहेत.